shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळणेबाबतचे श्रेय याप्रश्नी गेली साठ वर्षे आपापल्यापरिने लढा व योगदान देणारांनाच - धुमाळ


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 तालुक्यातील नऊ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी मूळ मालकांच्या वारसांना परत मिळणार आहेत,याचे श्रेय एकादोघांचे नसून गेली साठ वर्षे ज्यांनी ज्यांनी आपल्यापरीने खंडकरी व आकारी पडीत जमिनीच्या प्रश्नी चळवळ, आंदोलने, मोर्चे काढून लढा व योगदान दिले त्या सर्वांना आहे तसेच याबाबतचा निर्णय घेणाऱ्या राज्याचे मुख्यमंञी नाम.एकनाथ शिंदे तसेच त्यांचे नेतृत्वाखालील राज्य शासनाला आहे.


     त्यामुळे कोणीही एकट्यादुकट्यने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करुन खंडकरी व आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रदिर्घ लढ्याचा इतिहास माहित नसलेल्या नव्या पिढीची दिशाभूल करु नये, असे प्रतिपादन लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ यांनी केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना श्री.धुमाळ म्हणाले की, तालुक्यातील उंदिरगाव, माळवाडगांव, मुठेवाडगांव, खानापूर, वडाळा महादेव, ब्राम्हणगांव, निमगांव, खैरी व शिरसगांव या नऊ गावातील आकारी पड असलेली ७५०० एकर जमिन संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना परत करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच घेतला. सदरचा निर्णय जाहिर होताच याबाबतचे श्रेय महसूलमंञी राधाकृष्ण विखे व ॲड्. अजित काळे या दोघांनाच देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. हा राजकीय श्रेयवाद असून अशाप्रकारे श्रेय लाटणारांना गेली साठ वर्षे खंडकरी व आकारी पडीत शेतक-यांसाठी प्रदिर्घ लढा देणाऱ्यांचा विसर पडला आहे.
            आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी स्व. माधवराव गायकवाड, माजी आ.स्व.भास्करराव गलांडे पा., माजी आ.स्व.कॉ. पी.बी. कडू पा., स्व.खा.बाळासाहेब विखे, माजी आ.भानुदास मुरकुटे, माजी आ.स्व. दौलतराव पवार, माजी आ.स्व.जयंत ससाणे, कॉ. अण्णा पा.थोरात, कॉ.स्व. रामदास बांद्रे, भाजपाचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी, बाळानाथ गाढे, किसनराव आसने आदींसह अनेकांचा मोठा वाटा आहे. या सर्वांनी सुमारे साठ वर्षे खंडकरी व आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळण्यासाठी विविध आंदोलने, जेलभरो, सत्याग्रह, मोर्चे काढून याप्रश्नी लढा दिला. हा इतिहास दडवून श्रेय लाटण्याचा व राजकीय दिशाभूलीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप श्री.धुमाळ यांनी केला आहे.
      माजी आ.भानुदास मुरकुटे हे आमदार असताना त्यांनी खंडकरी व आकारी पडीत जमिनीच्या प्रश्नावर विविध आंदोलने केली. सन १९९१ मध्ये याप्रश्नी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली दहा हजार बैलगाड्यांसह आसूड मोर्चा काढण्यात आला. यात माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पा., माजी खा.स्व.भिमराव बडधे, माजी आ.स्व.दौलतराव पवार, कॉ.आण्णा पा.थोरात, स्व.रामदास बांद्रे, भाजपाचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी, माजी सभापती इंद्रनाथ थोरात आदी सहभागी झाले होते. यानंतर खंडकरी व आकारी पडीत शेतकऱ्यांनी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली शेती महामंडळाच्या तेराही मळ्यात कब्जा आंदोलन केले. याअंतर्गत माजी आ. श्री.मुरकुटे यांनी हरेगांव शेतमळ्याच्या सातवाडी व आठवाडी येथील क्षेत्रात स्वतः नांगर हाकून कब्जा आंदोलनाचा श्रीगणेशा केला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी जमिनींचा कब्जा घेतला आणि त्या कसण्यास सुरुवात केली. या जमिनींमध्ये शेतकऱ्यांनी विहिरी, बोअर घेतले. त्यांना माजी आ.मुरकुटे हे मुळा-प्रवरा वीज संस्थेचे चेअरमन असताना वीज कनेक्शन दिले. सदर जमिनी सन १९९२ पासून ताब्यात घेवून त्या संबंधित खंडकरी व आकारी पडीत शेतकऱ्यांनी सरकारकडून प्रत्यक्ष ताब्यात मिळेपर्यंत कसून त्याव्दारे उत्पन्नही घेतले. माजी आ.मुरकुटे यांच्या आमदारकीच्या पाठबळामुळेच कब्जा आंदोलन यशस्वी ठरुन या लढ्याला धार आली. नव्या पिढिला खंडकरी व आकारी पडीत शेतकऱ्यांच्या लढ्याचा हा इतिहास माहिती असणे आवश्यक असल्याचे श्री.धुमाळ म्हणाले.
        असा इतिहास व वस्तुस्थिती असताना आकारी पडीत जमिनी परत करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब होताच उपरोक्त इतिहास व प्रदीर्घ लढा देणाऱ्यांना विसरुन एकट्यादुकट्याने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक मुख्यमंञी नाम.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने आकारी पड जमिनी संबंधितांना परत करण्याचा निर्णय घेवून तसे प्रतिज्ञापञ उच्च न्यायालयात सादर केल्यानेच उच्च न्यायालयाने सदरचा निर्णय दिला. असे असताना याचे श्रेय फक्त महसूलमंञी श्री.विखे व ॲड्.काळे या दोघांनाच देणे हि राजकीय भूलथाप असल्याची टिका श्री.धुमाळ यांनी केली आहे.
close