shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जयस्वालचे स्टार्कला डिवचणे भारताला भोवले


               डे नाईट कसोटीच्या पहिल्या दिवशी  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ पहिल्या डावात केवळ १८० धावांवरच आटोपला.  प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात एक बाद ८६ धावा केल्या आहेत. तेंव्हा मार्नस लॅबुशेन २० आणि नॅथन मॅकस्वीनी ३८ धावांवर खेळत होते.  यादोघांमध्ये ६२  धावांची नाबाद भागीदारी झाली.  ऑस्ट्रेलियन संघ अजूनही भारताच्या ९४ धावांनी मागे आहे.  ऑस्ट्रेलियाला एकच धक्का बसला तो उस्मान ख्वाजाच्या रूपाने.  त्याला जसप्रीत बुमराहने स्लिपमध्ये कर्णधार रोहित शर्माकरवी झेलबाद केले.  त्याला १३ धावा करता आल्या. 


                 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारल्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव १८० धावांवरच आटोपला.  नितीश रेड्डीने सर्वाधिक ४२ धावा केल्या तर केएल राहुलने ३७ धावा केल्या.  ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या.  कसोटी कारकिर्दीतील त्याचा हा पंधरावा फाईफर ठरला. याशिवाय शुभमन गिल आणि केएल राहुल यांची भागीदारीही चांगली होती.  या दोघांच्या भागीदारीशिवाय मोठी भागीदारी झाली नाही.  जिथे एकवेळ भारताची धावसंख्या एक बाद ६९ धावा होती तिथे काही वेळाने पाच विकेटवर ८७ धावा झाल्या होत्या.  म्हणजेच १८ धावा करताना भारताने आणखी चार विकेट गमावल्या होत्या. 

             अश्विनने नितीश रेड्डीसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि सातव्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली.  स्टार्कने पुन्हा एकदा अडचणीत आणले आणि अश्विनला वाटचाल करायला लावली.  त्याला २२ धावा करता आल्या.  हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह खाते न उघडताच बाद झाले.  शेवटची विकेट म्हणून ५४ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४२ धावा करून नितीश स्टार्कचा सहावा बळी ठरला.  स्टार्कशिवाय पॅट कमिन्स आणि बोलंड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.  स्टार्कने ४८ धावांत सहा विकेट घेतल्या, हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. शेवटी त्याने जयस्वाल ने पहिल्या कसोटीत केलेल्या त्याच्या पिटाई व अपमानाचा बदला घेतला. आता याचे रूपांतर भारताचा पराभवात व पुढे मालिकेच्या विपरीत निकालावर नाही झाला तर देवच पावला अन्यथा भारताची डब्ल्यूसीपी फायनल येथेच झाल्यासारखी होईल.

               भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळवला जात आहे.  ही कसोटी डे नाईट टेस्ट असून गुलाबी चेंडूने खेळवली जात आहे. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने यशस्वी जयस्वालला पायचितच्या जाळ्यात पकडून पर्थमध्ये केलेल्या मारहाणीचा आणि स्लेजिंगचा बदला घेतला.  स्टार्कचा सामन्यातील पहिला चेंडू लेग स्टंपच्या लाईनमध्ये, चेंडू लेग स्विंग झाला आणि पॅडवर आदळून यशस्वीच्या खेळाचा डावाच्या सुरुवातीलाच अपयशी अंत झाला.  डीआरएससाठी नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या राहुलशी त्याने बोलले, पण राहुलने नकार दिला.  अशा प्रकारे पहिल्याच चेंडूवर भारताला मोठा धक्का बसला.  यशस्वीने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकविले होते. 

              खरं तर, पर्थमधील पहिल्या कसोटीदरम्यान यशस्वी स्टार्कला त्याच्या शतकादरम्यान स्लेजिंग करताना दिसला होता. स्टार्कने यशस्वीकडे टक लावून पाहिल्यावर यशस्वीनेही चोख प्रत्युत्तर दिले.  मात्र, दोघांच्याही स्वरात विनोद होता. भारताच्या दुसऱ्या डावात, १९ व्या षटकात, स्टार्कने ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर एक पूर्ण लांबीचा चेंडू टाकला, जो यशस्वीने सीमारेषेच्या पलीकडे ठोकला. यशस्वीकडे बघून स्टार्कही हसला.  पुढच्याच चेंडूवर यशस्वीने सरळ शॉट खेळून उत्कृष्ट बचाव केला. त्याने स्टार्कला स्पष्ट संदेश दिला की तो घाबरत नाही. यानंतरही जेव्हा स्टार्कने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा यशस्वी म्हणाला - तू मला खूप हळू गोलंदाजी करत आहेस. या दरम्यान हे वाक्य जगभर पसरलं. त्यामुळे निव्वळ स्टार्कच नाही तर संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ डिवचला. यानंतर या कसोटीत ऑस्ट्रेलियाने संपूर्ण दिवसात जो लाजवाब खेळ केला त्यावरून ते सगळेच किती डिवचले होते याचा प्रत्यय दिवसभर सगळ्यांनाच येत होता.

               आता दुसऱ्या कसोटीत स्टार्कने पहिल्याच चेंडूवर यशस्वीला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यावर त्याने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले.  कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने पेड्रो कॉलिन्सची बरोबरी केली. दोघांनीही प्रत्येकी तीन वेळा असे केले.  वेगिन, रिचर्ड हॅडली, ज्योफ अरनॉल्ड, कपिल देव आणि सुरंगा लकमल प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.

                भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे.  नाणेफेकीदरम्यान त्याने मधल्या फळीत फलंदाजी करणार असल्याचे सांगितले.  म्हणजे फक्त केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल सलामीला देणार.  त्याचबरोबर शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विनचेही पुनरागमन झाले आहे.  देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.  त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनेही त्याच्या प्लेइंग-११ मध्ये एक बदल आहे.  जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलंडचे पुनरागमन झाले.

                  कर्णधार रोहित सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.  म्हणजेच तो २१९३ दिवसांनंतर कसोटीत मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसला.  रोहित मात्र बॅटने विशेष काही करू शकला नाही आणि स्कॉट बोलंडच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला.  त्याला केवळ तीन धावा करता आल्या. मधल्या फळीतील फलंदाजीबाबतही रोहितसोबत एक विचित्र योगायोग घडला आहे.  शेवटी त्याने मधल्या फळीत फलंदाजी केली होती, ती ॲडलेड कसोटीतच होती.  हिटमॅनने शेवटची फलंदाजी सन २०१८ मध्ये कसोटीत मधल्या फळीत केली होती.  त्यानंतर भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता.  या मालिकेतील पहिला सामना ॲडलेडमध्ये झाला होता.  भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला.  त्यावेळी विराट कोहली कर्णधार होता.  त्या सामन्यात ओपनिंग केएल राहुल आणि मुरली विजयने केली होती.  तर रोहित सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.  ती कसोटीही ६ डिसेंबरपासून खेळवली गेली.  म्हणजे २१९३ दिवसांनंतर रोहितने पुन्हा मधल्या फळीत फलंदाजी केली.  याच बॅटिंग पोझिशनमधून त्याने टेस्ट बॅटिंग करिअरला सुरुवात केली होती.

                त्यानंतर रोहितने त्या कसोटीत मधल्या फळीत फलंदाजी करत पहिल्या डावात ३७ धावा आणि दुसऱ्या डावात एक धावा काढली होती.  टीम इंडियाने ती कसोटी ३१ धावांनी गमावली.  मात्र, चेतेश्वर पुजाराला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.  पुजाराने पहिल्या डावात १२३ आणि दुसऱ्या डावात ७१ धावा केल्या होत्या.  भारताने ही मालिका २-१ ने जिंकली.  आता रोहित मधल्या फळीत फलंदाजीला आला असून, कसोटी ॲडलेडमध्येच खेळवली जात आहे आणि तीही ६ डिसेंबरपासून.  मात्र सन २०१८ ची कसोटी दिवस-रात्र नव्हती एवढंच. बाकी सर्व काही सारखंच घडलं.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close