इंदापूर: काल इंदापूर तालुक्यातील बावडा परिसरातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसाने शेती व घरांचे अतोनात नुकसान झाले असून आज पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे यांनी भांडगाव ,वडापुरी परिसरातील अनेक फळबागांना तसेच नुकसानग्रस्त घरांना भेटी देऊन तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काल बावडा भागामध्ये मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऊस,केळी,डाळिंब, पेरू तसेच तोंडले या पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी घरे तसेच जनावरांच्या गोठ्यांची सुद्धा हानी झालेली आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याने केळी,डाळिंब सारखी हाता तोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाल्याचे शेतकऱ्यांनी श्रीराज भरणे यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी श्री.भरणे यांनी तहसीलदार जीवन बनसोडे,तालुका कृषी अधिकारी दिपक गरगडे यांना तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे तसेच घरांचे पंचनामे करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.तसेच गाव पातळीवर सुद्धा तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी सकाळपासून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे,पंचायत समिती सदस्य अजित खबाले यांच्यासह शासकीय अधिकारी,कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच एका बाजूला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे स्वतः सकाळपासून इंदापूर तालुक्याच्या विविध भागात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत असताना दुसरीकडे त्यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे सुद्धा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

