जपानच्या बाबा वेंगाने 2025 मध्ये जुलै महिन्यात त्सुनामी आणि भूकंपाचे मोठे संकट येण्याचे भाकीत वर्तवले आहे. याचा फटका जपान, इंडोनेशिया आणि भारतालाही बसू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जगभरातील सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय उलथापालथींमुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जपानमधील प्रसिद्ध भविष्यवक्ता रियो तुतुस्की, ज्यांना ‘जपानी बाबा वेंगा’ म्हणून ओळखले जाते, यांनी जुलै 2025 मध्ये त्सुनामीसारख्या मोठ्या आपत्तीचे भाकीत वर्तवले आहे. या संकटाचा परिणाम जपान, इंडोनेशिया, तैवान, हाँगकाँग यांच्यासह भारतावरही होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
म्यानमारमधील अलीकडील भूकंप आणि चीनच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली भूकंपाची शक्यता यामुळे या भाकिताकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. यापूर्वीच्या अचूक भविष्यवाणींमुळे तुतुस्की यांच्या या इशाऱ्याने चिंता वाढवली आहे.
रियो तुतुस्की यांनी यंदा जानेवारीत जपान, तैवान, हाँगकाँग आणि इंडोनेशियामध्ये भूकंप आणि त्यानंतर त्सुनामी येण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यांच्या मते, जुलै 2025 मध्ये पॅसिफिक महासागरात मोठा भूकंपीय बदल घडेल, ज्यामुळे प्रचंड त्सुनामी उद्भवेल. ही आपत्ती जपान आणि इंडोनेशियाच्या किनारपट्टीला सर्वाधिक प्रभावित करेल, परंतु भारताच्या दक्षिण आणि पूर्व किनारी भागांनाही याचा धोका आहे.
2004 मधील इंडोनेशिया त्सुनामीने भारताच्या तमिळनाडू आणि अंदमान-निकोबार बेटांवर मोठी हानी केली होती, आणि तुतुस्की यांच्या भाकितानुसार अशीच किंवा त्याहून मोठी आपत्ती येऊ शकते. म्यानमारमधील 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर त्यांच्या भविष्यवाणीकडे लक्ष वेधले गेले आहे.