श्रीरामपूर /:प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर यांच्या वतीने कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि. २८ ते ३० मे २०२५ या कालावधीत पहिल्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाचे निवासी प्रशिक्षण नुकतेच सुरू झाले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात यंदा पहिल्या इयत्तेपासून झाली आहे. या बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय स्तरावरील सीबीएससीच्या धरतीवर या अभ्यासक्रमाचा शिक्षण विभागाने स्वीकार केल्यामुळे अभ्यासक्रमात बदल करणे क्रम प्राप्त आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रशिक्षणाचे संयोजन अधिव्याख्याता अरुण भांगरे यांच्याकडे आहे. या प्रशिक्षणासाठी एससीएफ- एफएस २०२४, मूल्यमापन व एचपीसी पार्श्वभूमी व नमुना, भाषा शिक्षण, गणित शिक्षण, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण या सात विषयांवर सुलभकांमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षणानंतर सोबत सुलभकांमार्फत तालुकास्तरावर दि. २ ते १५ जून २०२५ या कालावधीत पहिल्या इयत्तेचे बदलत्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील १४४ पेक्षा अधिक सुलभक सहभागी झाली आहेत. त्या निवासी प्रशिक्षणाच्या उद्घाटनपर मनोगतातून अरूण भांगरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रमाचे महत्त्व विशद केले.
यावेळी व्यासपीठावर संजय दहिफळे, डॉ. रामेश्वर लोटके व मुकुंद दहिफळे यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या प्रशिक्षणात सुलभकांना प्रत्येक तास तासिका संपल्यानंतर दहा मिनिटाची चाचणी सक्तीची असून प्रशिक्षणार्थींची उपस्थिती ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. तालुकास्तरीय प्रशिक्षण प्रत्येक प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सक्तीचे असून अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, समन्वयक, विषय साधन व्यक्ती, केंद्रप्रमुख यांच्या मदतीने तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111