shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंग्लंडच्या तीव्र प्रतिकारानंतर भारताच्या अडचणी वाढल्या


                भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर संपला. दुसऱ्या डावात दोन विकेट गमावल्यानंतर भारताने ९० धावा केल्या आहेत. यासह त्यांची आघाडी ९६ धावांपर्यंत वाढली आहे. केएल राहुल ४७ तर शुभमन गिल सहा धावांवर नाबाद आहेत.


                भारताने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या होत्या. इंग्लंडने पहिल्या डावात ऑली पोपच्या शतक आणि हॅरी ब्रूकच्या ९९ धावांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद ४६५ धावा केल्या. अशाप्रकारे भारताला सहा धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर टीम इंडियाने दोन विकेट गमावून ९० धावा केल्या होत्या आणि त्यांची आघाडी ९६ धावांपर्यंत वाढली.

                 दुसऱ्या डावात भारताची सुरुवात धक्कादायक झाली. अवघ्या १६ धावांवर ब्रायडन कार्सेने यशस्वी जयस्वालला यष्टीरक्षक जेमी स्मिथकडून झेलबाद केले. त्याला ११ चेंडूत फक्त चार धावा करता आल्या. यानंतर केएल राहुल आणि साई सुदर्शन यांनी जबाबदारी स्विकारली. दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये ६६ धावांची भागीदारी झाली जी बेन स्टोक्सने मोडली. त्याने सुदर्शनला जॅक क्रॉलीने झेलबाद केले. तो ४८ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. खेळ थांबला तेव्हा सलामीवीर केएल राहुल ७५ चेंडूत ७ चौकारांसह ४७ धावा तर शुभमन गिल १० चेंडूत १ चौकारासह ६ धावा नाबाद परतले.

                 इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ४६५ धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे भारताला सहा धावांची आघाडी मिळाली. याआधी भारताने ४७१ धावा केल्या होत्या. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात ३ बाद २०९ या धावसंख्येने केली. त्यावेळी ऑली पोप १०१ धावांवर तर हॅरी ब्रुक खाते न उघडता मैदानात होते. त्याआधी, इंग्लंडकडून बेन डकेटने ६२ धावा तर जॅक क्रॉलीने चार धावा केल्या होत्या.

               तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्याने ऑली पोपला यष्टिरक्षक रिषभ पंतकडून झेलबाद केले. तो १३७ चेंडूत १४ चौकारांसह १०६ धावा काढून बाद झाला. यानंतर, हॅरी ब्रुक आणि बेन स्टोक्स यांनी डावाची जबाबदारी स्विकारली. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ५१ धावांची भागीदारी झाली, तो मोहम्मद सिराजने कर्णधार स्टोक्सला पंतकरवी झेलबाद करून तोडली. स्टोक्सने ५२ चेंडूत २० धावा केल्या.  यासह, पंतने कसोटीत १५० झेल पूर्ण केले. कसोटीत १५० बळी घेणारा तो तिसरा भारतीय यष्टिरक्षक ठरला.

                इंग्लंडने २७६ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या तेंव्हा इंग्लंडला मोठ्या भागीदारीची आवश्यकता होती. त्यांची गरज ब्रुक आणि जेमी स्मिथ यांनी पूर्ण केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८८ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली आणि धावसंख्या ३५० च्या जवळ पोहोचवली. प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथला आपला बळी बनवले. तो पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४० धावा काढून बाद झाला. यानंतर ब्रूक वोक्ससोबत सामील झाला. त्यांनी सातव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात ब्रूक ९९ धावांवर बाद झाला. त्याचे नववे कसोटी शतक फक्त एका धावेने हुकले. त्यालाही प्रसिध्द कृष्णाने तंबूत पाठवले. त्यानंतर वोक्सने ब्रायडन कार्सला साथ दिली आणि दोघांनी ५५ धावांची भागीदारी केली. सिराजने कार्सला बाद केले. कार्सने २३ चेंडूत २२ धावा काढल्या. बुमराहने ख्रिस वोक्सला आपला बळी बनवले. त्याने ५५ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३८ धावा काढल्या. जोश टोंगने ११ धावा केल्या तर शोएब बशीरने एक धावेवर नाबाद राहिला. 

              इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच बळी घेतले. त्याने कसोटीत १४ व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या. दरम्यान, प्रसिद्ध कृष्णाने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन गडी बाद केले. रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांची पाटी मात्र कोरीच राहिली. 

            भारतीय कर्णधार शुभमन गिलची हि कर्णधार म्हणून पहिली कसोटी आहे. फलंदाजी त्याने छान कामगिरी केली. मात्र त्याच्या नेतृत्वगुणांची खरी परीक्षा क्षेत्ररक्षणा दरम्यान झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटीसाठी कर्णधार म्हणून जी प्रगल्भता लागते ती गिलमध्ये दिसली नाही. गोलंदाजीतील अनाकलनीय बदल, क्षेत्ररक्षण लावताना केलेल्या गंभीर चुका व क्षेत्ररक्षाकांकडून बिलकुल न मिळालेल साथ यामुळे त्याच्या कर्णधारपदाचा पहिला अनुभव त्याला वाईट राहिला. दरम्यान भारताचे क्षेत्ररक्षण इतके गचाळ होते की, त्याचा लाभ इंग्लंडच्या फलंदाजांनी अचूक उचलला. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी तब्बल सहा झेल सोडून इंग्लंडला मुसंडी मारण्याची जणू संधीच दिली. फलंदाजांनी धावा रोखण्यात कुचराई केली. याचा परिणाम बुमराह सोडून प्रत्येक गोलंदाजांचे पृथक्करण बिघडवण्यास कारणीभूत ठरले. त्यामुळे इंग्लंडचा धावांचा आकडा फुगला. एरव्ही भारताला मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा होती, मात्र ती जेमतेम धावा इतकीच राहिली. त्यामुळे हा सामना समतोल स्थितीत आला.

                 जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीचा भार एकहाती वाहताना दिसतो. एवढेच नाही तर भरभरून बळीही घेतो. इंग्लंडच्या डावात पाच बळी घेऊन इंग्लंडच्या फलंदाजांना आवर घालण्याचे काम केले. सेना देशात सर्वाधिक बळी घेणारा आशियाई गोलंदाज बनण्याचा मान त्याला मिळाला. भारतीय वेगवान गोलंदाजात सर्वाधिक बळींचे पंचकही त्याने साधले. एवढया सगळ्या सकारात्मक बाबी त्याच्याकडू घडत असताना एक अघोरा प्रमाद त्याच्याकडून इंग्लंडच्या डावात घडला. इंग्लंडकडून ९९ धावांची शानदार खेळी करणारा हॅरी ब्रुक शुन्यावर असताना मोहम्मद सिराजकडे झेल देऊन जवळ जवळ बाद झाला होता.  मात्र बुमराहने तो चेंडू टाकताना स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही व नोबॉल पडला. यामुळे इंग्लंडला भारताला मागे सारण्यात यश मिळाले.

                  यशस्वी जयस्वाल भारताचा उभारता खेळाडू आहे. पहिल्या डावात त्याने शतक करून मौल्यवान योगदान दिले. मात्र क्षेत्ररक्षणा दरम्यान तीन महत्वाचे झेल सोडून स्वतःच्या शतकी खेळीवर अक्षरशः पाणी सोडले. त्यामुळे इंग्लंडला सामन्यात कमबॅक करता आले. या सर्व गोष्टींचा यशस्वीच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला व तो दुसऱ्या डावात केवळ चार धावांवर बाद झाला. या सर्व बाबी भारताला पिछाडीवर ढकलण्यात कारणीभूत ठरल्या.

                सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी भरतीय फलंदाजांनी मागील तीन दिवसात झाले गेले विसरून जबरदस्त पुनरागमन करण्याची गरज आहे. असे करण्यात ते यशस्वी झाले तर टिम इंग्लंडला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याची संधी मिळू शकते. फलंदाजांची चांगली कामगिरी गोलंदाजांनाही पाठबळ देऊ शकते. त्या बळावर गोलंदाज भारताला पहिल्या कसोटीत विजयी मिळवून देऊ शकतात.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close