एरंडोल (प्रतिनिधी) –गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने एरंडोल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात उभे असलेले पिके पाण्यात जमीनदोस्त झाली, घरामध्ये पाणी शिरून संसार उद्ध्वस्त झाले, तर पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी व गोरगरिब जनता मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे.
या भीषण परिस्थितीची जाण ठेवून आमदार अमोल पाटील यांनी स्वतः शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. रवंजे बु. व खु., पिंपळकोठा प्र.चा., खर्ची, टोळी या गावांमध्ये भेट देत शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. पिकांचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.
या पार्श्वभूमीवर आमदार अमोल पाटील म्हणाले –
"या आसमानी संकटाने सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. प्रशासनाला तात्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझ्यासह प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. शेतकरी बंधूंनी धैर्य सोडू नये; शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
तसेच त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, पावसाचा जोर अद्याप सुरूच आहे, त्यामुळे शेतीची साधने, पशुधन व कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे. कोणत्याही अडचणीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. शेतीवरील अवकाळी संकटामुळे आर्थिक कोंडी झाल्याचे सांगून शासनाकडून मदतीची मागणी केली. आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर देत तातडीने मदतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.



