श्रीरामपूर(वार्ताहर) संतसहवास आणि संतसाहित्य यांचा ध्यास हवा कारण संतसहवास म्हणजे सतगुणां चा संस्कार आणि संतसाहित्य म्हणजे अमृतवाणींचा अनुभव असतो, असे मत महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेचे अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अण्णासाहेब भाऊसाहेब महाराज शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील सर्वेश्वर धर्म मंडळाचे ह.भ.प. विठ्ठलराव महाराज साबळे यांनी आयोजित पदाधिकारी निवड आणि प्रबोधन सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे डॉ. बाबुराव उपाध्ये उपस्थित होते. यावेळी वारकरी साहित्य परिषदेच्या तालुका उपाध्यक्षपदी ह.भ.प. अशोकराव महाराज शिंदे, शहर अध्यक्षपदी ह.भ.प. डॉ. पुरुषोत्तम कोळपकर महाराज, ह.भ.प. तालुका मार्गदर्शक म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर तालुका महिला मंडळं अध्यक्षपदी सौ. रुक्मिणीताई साबळे, उपाध्यपदी सौ. चंद्रकलाताई भाऊसाहेब डोळस, तालुका सचिवपदी ह.भ.प. विठ्ठलराव महाराज साबळे यांच्या निवडी करून उत्तर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अण्णासाहेब शिंदे महाराजांनी त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली.मान्यवरांच्या हस्ते श्रीविठ्ठल सक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात आले. ह.भ.प. अशोकराव महाराज शिंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून भजनगीते सादर केली. संयोजक ह.भ.प.विठ्ठलराव महाराज साबळे यांनी सर्व मान्यवरांना शाल, नारळ, पुष्पे आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. ह.भ.प. डॉ. कोळपकर महाराजांनी आनंद व्यक्त करीत सांगितले की,संतसंगती आणि संतसाहित्य घरोघरी पोचविण्याचा नक्कीच पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी वारकरी साहित्य परिषदेची श्रीरामपूर शाखा नेहमीच लोकप्रिय होईल असे सांगून ग्रंथभेट देऊन ह.भ.प. अण्णासाहेब शिंदे महाराजांचा सन्मान केला. यावेळी बेबीताई पवार, चंद्रकला डोळस, रुक्मिणीताई साबळे, कावेरीताई खळेकर, विवेक भोईर, संजीव खळेकर, बहिरनाथ कोरडे, विलासराव आबक,भारत गुंजाळ आदिंनी या भक्तीउपक्रमात भाग घेतला. ह.भ.प. अशोकराव महाराज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर ह.भ.प. विठ्ठलराव महाराज साबळे यांनी आभार मानले.भजनगायन व स्नेहफराळाने कार्यक्रमाची सांगता झाली.

