श्रीरामपूर प्रतिनिधी:-
श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्टेशनजवळील नेवासा रोड परिसरात नव स्वराज्य सेनेच्या वतीने संत गुरु रविदास यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नव स्वराज्य सेनेचे अध्यक्ष विजयराव खाजेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजयराव खाजेकर म्हणाले की, संत गुरु रविदास यांनी दिलेले समता, सामाजिक न्याय व बंधुत्वाचे विचार आजच्या समाजाला दिशा देणारे आहेत. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याचा संदेश त्यांच्या विचारांतून मिळतो. तरुणांनी संत गुरु रविदास यांच्या विचारांचे आचरण करून समाज परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास संपत मोरे, रवी गरेला, दशरथ भोंगळे सर, उत्तम हिवराळे, आंतोन भरपूरे आदी पदाधिकारी तसेच नव स्वराज्य सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

