येवला | प्रतिनिधी-(संतोष राऊळ):
महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि येवला तालुक्याचे भाग्यविधाते लाडके आमदार मा. ना. छगन भुजबळ साहेब यांच्या क्रियाशील प्रयत्नातून येवला येथे गरीब व गरजू जनतेसाठी दोन शिवभोजन केंद्रांची सुरुवात झाली आहे.
येवला येथील जुनी पंचायत समिती समोर, विंचूर रोड तसेच येवला ग्रामीण रुग्णालयाजवळ, फत्तेबुरुज नाका या ठिकाणी ही केंद्रे सुरु असून अवघ्या 5 रुपयात अतिशय उत्कृष्ट असे जेवण मिळते. स. 11.00 ते 3.00 या वेळेत शिवथाळी चे वितरण होत असून दररोज 150 थाळींची मर्यादा आहे.केंद्राचे व्यवस्थापक गोटू मांजरे तसेच संजय गांगुर्डे यांना संपर्क साधला असता त्यांनी अशी माहिती दिली कि हा गरजू जनतेसाठी अतिशय चांगला उपक्रम असून मर्यादेपेक्षा अधिक लोकांची यासाठी मागणी आहे. तसेच जनतेला कायम उत्कृष्ट पध्दतीचे भोजन ते या माध्यमातून पुरवता आहेत आणि यापुढे देखील असेच उत्कृष्ट भोजन कायम पुरवणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.
कोरोना आजाराने सध्या देशासह राज्यात थैमान घातल्यामुळे अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती उद्भवलेली होती.अशा स्थितीत गोरगरीब जनता तसेच मजुरांना कुठल्याही प्रकारचे उदरनिर्वाहासाठी साधन नाही व हाताला रोजगारही नाही. अश्या या वाईट परिस्थितीत शिवभोजन थाळी म्हणजे गरिबांसाठी नव संजीवनीचेच काम करते आहे.



