राजगुरूनगर । प्रतिनिधी ( विद्याधर साळवे ) : शिरोली ( तालुका खेड ) येथे दोन अनोळखी युवकांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . त्यामुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.खेड तालुक्यातील शिरोली गावातील खापरदरा परिसरातील हरणटेकडी येथे शनिवारी सकाळी शिरोली येथील गावातील गुराखी गुरे चारण्यासाठी गेले असता अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना दोन युवकांचा खून झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत राजगुरुनगर पोलिसांना कळविले.
राजगुरूनगर पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना दोन तरुणांचे मृतदेह त्या ठिकाणी आढळून आले दोन्ही युवकांच्या तोंडावर व अंगावर धारदार हत्याराने वार केल्याचे पोलिसांना दिसून आले तसेच मृतदेहाच्या बाजूस दारूची ग्लास आणि गांजा पिण्याची चिलीम आढळून आली. त्यामुळे आधी या तरुणांनी येथे पार्टी केली असावी आणि त्यानंतर जवळच्या व्यक्तींनी त्या तरुणांचा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज राजगुरुनगर पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन्ही युवकांच्या तोंडावर व अंगावर धारदार हत्याराने वार केल्यामुळे या युवकांची ओळख पटविणे पोलिसांसमोर अवघड बनले आहे.
हत्या झालेले तरुण हे साधारणपणे 25 ते 30 वयोगटातील असून पार्टीच्या निमित्ताने आडबाजूच्या रानात येऊन ओळखीच्या किंवा एकमेकांचे मित्र असलेल्या व्यक्तीने हे कृत्य केले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दञरम्यान घटनास्थळी खेड पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे , पोलीस निरीक्षक सतीश गुरव , सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

