सावळीविहीर( प्रतिनिधी):
शिर्डी येथील श्री साईबाबांचे मंदिर येत्या 10 सप्टेंबर 2020 पर्यंत शासनाने मान्यता देऊन श्री साईबाबा संस्थानने ते भाविकांना दर्शनासाठी सुरू करावे, अन्यथा राहता तालुका व शिर्डी शहर मनसे यांच्यावतीने श्री साईबाबा संस्थानचे कुलूप तोडून श्री साईबाबा मंदिरात प्रवेश करून श्री साईबाबांच्या मुर्तीवर दुग्धाभिषेक घालण्यात येईल. असा इशारा राहता तालुका व शिर्डी शहर मनसे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
आज दि,४,शुक्रवारी राहता व शिर्डी मनसे शाखेच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांना एक निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की ,कोरोनामुळे लॉक डाऊन होता.त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती .शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर हे 17 मार्च तीन वाजेपासून बंद आहे. ते आजपर्यंत बंद आहे. मात्र आता लॉकडाउन संपवुन अनलॉक 4 चालू झाला आहे .इतर राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दारू दुकाने व इतर सर्व दुकाने सुरू झाली आहेत. मात्र धार्मिक स्थळे अद्यापही बंद आहेत.
त्यामुळे भक्तांनी कोरोणा हद्दपार व्हावा म्हणून साकडे कुठे घालायचे? कोणाला घालायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे .महाराष्ट्रातील सर्व मंदिरे दर्शनासाठी सुरू करावीत. असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.व राज ठाकरे यांच्या आदेशाने राहता व शिर्डी मनसेच्या वतीने शिर्डीचे येत्या दहा सप्टेंबरपर्यंत श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी खुले करावे. संपूर्ण जगात साईभक्त मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येकाची साई बाबांवर श्रद्धा आहे. तसेच शिर्डी परिसरातील सुमारे 40 गावे साईबाबा मंदिर व येणाऱ्या साई भक्तांवर आर्थिक दृष्टीने अवलंबून आहेत. मात्र सध्या तेच बंद असल्यामुळे येथे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
त्याच प्रमाणे कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी श्री साईबाबा संस्थानकडे मनुष्यबळ तसेच दर्शन रांगेची ,सोशल डिस्टंन्स व सर्व व्यवस्था सज्ज आहे. मात्र शासनाची मान्यता मिळणे गरजेचे आहे. राज्यात दारुदुकानासह सर्व दुकाने सुरू असताना श्री साईबाबांचे मंदिर बंद आहे. ते दहा तारखेच्या आत सुरू करावे .अन्यथा 10 सप्टेंबर नंतर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल व श्री साईबाबा संस्थानचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून श्री साईबाबांना मनसेच्या वतीने दुग्धाभिषेक घालण्यात येईल. असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
हे निवेदन श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी स्वीकारून यावेळी आपले निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच. बगाटे यांच्याकडे निवेदन देण्यात येईल. व शासनालाही तसे कळविण्यात येईल .असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मनसेचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष दत्तू कोते,राजेश लुटे,रामनाथ सदाफळ,विजय मोगले, प्रशांत वाकचौरे,प्रसाद महाले, गणेश जाधव ,लक्ष्मण कोतकर, सौरभ हाडवळे, गणेश गाडेकर, अजिंक्य गाडेकर, स्नेह गाडेकर, पदाधिकारी उपस्थित होते.

