हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.३०,उत्तर प्रदेशातील हाथरस येथील येथे २० वर्षीय मागास समाजातील तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने निषेध व्यक्त करून विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्यामार्फत राष्ट्रपती, भारत सरकार यांना निवेदन पाठविण्यात आले.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनानुसार आंबेडकराईट पार्टीच्या वतीने हाथरस येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच या निमित्ताने राष्ट्रपती यांच्याकडे मागण्या सुद्धा करण्यात आल्या. त्यानुसार उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी, जातीवादी सरकारच्या काळात एससी एसटी आणि मागास समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करून त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करून या कायद्याखाली दाखल होणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल न घेणार्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रथम खबरी अहवाल यामध्येच सहआरोपी करण्यात यावे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल झालेल्या खटल्यांमध्ये फिर्यादीला त्यांच्या इच्छेनुसार वकील लावायचा असल्यास सदर खाजगी वकीलाची संपूर्ण फीस शासनामार्फत देण्यात यावी आणि या संदर्भाने फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये आवश्यक ते बदल करण्यात यावेत, हाथरस येथील घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधा देण्यात याव्यात अशी मागणीसुद्धा निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष धिमान ऍड. रावण धाबे, जिल्हा महासचिव धिमान रवी शेखर पाटील, जिल्हा महासचिव धिमान अशोक पानपट्टे, जिल्हा सचिव धिमान विनोद भालेराव, महिला आघाडीच्या धिमान मंगलाबाई पवार, तालुकाध्यक्ष धिमान शेख फजल, माधव वाढवे, अशोक खंदारे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

