तात्काळ ठेवी परत करा अन्यथा ठेवीदार आंदोलन करतील - आप्पासाहेब ढुस
राहुरी - परळी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या देवळाली प्रवरा शाखेत ठेवीदारांचे तब्बल ८० लाख रुपये अडकले असून वारंवार मागणी करूनही ही पतसंस्था ठेवीदारांच्या ठेवी परत देत नसल्याने देवळाली प्रवरा येथील ठेवीदारांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे सह राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार राहुरी, व पोलीस निरीक्षक राहुरी, व तहसीलदार राहुरी यांना देवळाली प्रवरा येथील ठेवीदारांनी लिहलेल्या निवेदनात म्हटले आहे की,परळी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या देवळाली प्रवरा शाखेत आम्ही ठेवी ठेवल्या आहेत. कित्येक दिवसांपासून ही शाखा बंद असून ठेवी परत मिळण्यासाठी आम्ही पतसंस्थेच्या संबंधित अधिकारी यांना फोन करून आमच्या ठेवी परत मिळण्यासाठी विनंती करीत असून आम्हाला आमच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत.
सदर पतसंस्था बंद असल्याने आमची फसवणूक झाली म्हणून आम्ही राहुरी पोलीस ठाण्यात एप्रिल 2020 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तथापि आज पावेतो कोणतीही चौकशी किंवा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने आज राहुरी पोलीस ठाण्यात दुबार तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जर या तक्रारीची सुद्धा राहुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही तर ठेवीदार तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारतील अशी माहिती आंतरराष्ट्रीय खेळाडू व सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढुस यांनी निवेदन सादर करताना आमचे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
राहुरीच्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन देण्यासाठी आप्पासाहेब ढुस यांचे समवेत राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे, राहुरी तालुका डॉ केमिस्ट चे संस्थापक विलास पाटील, डॉ तनपुरे साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण कोंडीराम ढुस, डॉ. सुधीर क्षीरसागर, ठेवीदार डॉ. नामदेव कडू, सागर गडाख, मच्छिंद्र टेकाळे, रेवजी सांबरे, सुनील महाडिक, रमेश वाळके, किसन टिककल आदी निवेदनावर स्वाक्षरी करणारे ठेवीदार उपस्थित होते.

