shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"कोणाचं घरटं मोडू नका..!! "


- सत्य घटनेवर आधारीत..

टी. एन्. शेषन् भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांच्या जीवनात घडलेला प्रसंग !

एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते. उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती. वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय, पक्ष्यांची अनेक, सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.

जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं. त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली, तर बाग किती शोभून दिसेल. त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.

गाड्या थांबल्या. त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते, ते इकडे तिकडे शोधायला लागले. तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता. त्याला बोलावलं. तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय, हे त्यानी ओळखलंच. त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली आणि प्रत्येक घरट्याचे १० रु. देऊ असंही सांगितलं. त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. "दहा रुपये कमी वाटतायंत का? ५० रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे."

यावर तो मुलगा म्हणाला, "सरजी, पैशाचा सवालच नाही. कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही."
"का रे बाबा?"
"त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत. सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल, पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल, आक्रोश करेल, ते माझ्याच्यानं पाहवणार नाही. कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी."
हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.

शेषन् म्हणाले, "कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं. माझं पद , माझी पदवी, उच्च शिक्षण सार्‍या सार्‍याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला, वितळून गेला. जे शिक्षण, संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.".

जरूर शेयर करा..
close