हर घर जल योजना केंद्र सरकारची- भाजप
- राज्यमंत्र्यांनी श्रेय घेऊ नये
इंदापूर प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची हर घर जल ही महत्वकांशी योजना आहे. या योजनेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन १९२०-२१च्या अर्थसंकल्पात तब्बल ३.५ लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. मात्र इंदापूर मधील पाणी योजनांसाठी रू. २५० कोटींचा निधी अशी घोषणा करून तालुक्याचे राज्यमंत्री हे या योजनेतील निधीचे श्रेय घेत आहेत.सदरची हर घर जल योजना केंद्र सरकारची असल्याने राज्यमंत्र्यांनी या योजनेचे श्रेय घेऊ नये, असे प्रतिपादन इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष ॲड. शरद जामदार शनिवारी (दि.१३) केले.
इंदापूर तालुक्यात १४० गावात घरोघरी शुद्ध पाणी जाणार, २५० कोटींचा निधी अशा बातम्या राज्यमंत्र्यांच्या नावे शनिवारी प्रसिद्ध झाल्या आहेत. यासंदर्भात तालुका भाजपचे अध्यक्ष शरद जामदार यांनी आपली भूमिका मांडली. तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेल्या राज्यमंत्र्यांना पोकळ घोषणा करण्याची सवय लागली आहे. राज्यमंत्री अनेकदा केलेल्या घोषणांचा निधी तालुक्यात आला आहे का ? अशी सवालही त्यांनी केला .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी अनेक कि.मी. पायपीट करावी लागते, अशुद्ध पाण्यामुळे अनेकांना आजार होतात, म्हणून प्रत्येक घरात नळ कनेक्शन व शुद्ध पाणी देणेसाठी केंद्र सरकारच्या बजेट मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेची घोषणा केली व शुभारंभ केला. त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी करणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशातील प्रत्येक घरात या योजनेच्या माध्यमातून सन २०२४ पर्यंत नळ कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात या योजनेसाठी निधी जाहीर केल्याने सध्या देशात सर्व राज्यात या योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेत पुणे जिल्ह्यातील २०४७ गावांसाठी सुमारे २९४५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याची माहितीही तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी दिली.
____________________________

