संगमनेर । प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे उधारीचे पैसे मिटविण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये न आणल्याच्या रागातून पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.
याबाबत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ मोहीम वय ४० रा. जामगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद याने आश्वी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार माझी बहिण ज्योती उर्फ अनिता सोमनाथ दिघे वय ३३ हिचा विवाह पानोडी येथील सोमनाथ शंकर दिघे यांच्याबरोबर सोळा वर्षापूर्वी झाला.
तिला दोन मुली व एक मुलगा आहे. तिचा पती सोमनाथ दिघे हा माहेरून पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देत असे. दीड महिन्यापूर्वी जामगाव येथे बहिण व मेव्हणे आले होते. त्यावेळी लोकांची उधारी मिटवण्यासाठी मेव्हणे सोमनाथ यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. अडचण असल्याने पैसे नसल्याचे त्यांना सांगितले. ते रागाच्या भरात बहिणीला घेऊन पानोडी येथे निघून गेले.
शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना पानोडी येथून संजय जाधव यांनी फोन करून तुमची बहिण प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल आहे असे सांगितले. दवाखान्यात आले असता तिचा मृत्यू झाल्याचे समजले. तिचा मृतदेह रक्ताने माखलेला होता. ५० हजार ना दिल्याच्या रागातून बहिण ज्योती हिचा खून केल्याची असे फिर्यादीत म्हंटले आहे. यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसनिरीक्षक सुधाकर मांडगावकर व त्यांच्या पथकाने सोमनाथ दिघे यास ताब्यात घेतले आहे.

