मुंबई: राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू..! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीबांसाठी 5476 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. राज्यातील गोरगरीबांना निर्बंध लागू झाल्यापासून एक महिना 3 किलो गहू, आणि 2 किलो तांदूळ देण्यात येणार. तसेच शिवभोजन थाळीही महिनाभर मोफत देणार आहे. तसेच सरकारी योजनेचे नोंदणीकृत लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 हजार रुपये देण्यात येणार असून बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच अधिकृत फेरिवाल्यांनाही दीड हजार रुपये देणार आहे.
परवानाधारक रिक्षाचलाकांनाही दीड हजार रुपये, आणि खावटी योजनेचा लाभ घेणाऱ्या आदिवासींनाही 2 हजार रुपये देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. (cm uddhav thackeray declear 5400 cr packege for poor in maharashtra)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध वर्गातील नागरिकांना आर्थिक पॅकेजची घोषणा केली.
राज्यातील 7 कोटी लाभार्थींना पुढील 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ देणार. पुढचा एक महिना 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत देणार. आधी 10 रुपयांची थाळी 5 रूपयाला केली आता मोफत करणार. ही सरकारची जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे म्हणाले. राज्यातील 35 लाख लोकांना 1000 रुपये आगाऊ देणार, तसेच राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार. त्याचा 12 लाख कामगारांना उपयोग होणार आहे. आदिवासी कुटुंबाना प्रति कुटंब 2000 रुपये देणार. त्यांची संख्या 12 लाख आहे. त्याशिवाय घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत देण्यात येणार असून अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार असल्याचं त्यांनी जाहीर केले.
5476 कोटींच्या निधीला मंजूरी
कोविड संदर्भातील सुविधा उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी 330 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत. तसेच या सर्व पॅकेजसाठी 5476 कोटी रुपये निधी बाजूला काढून ठेवले असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
हवाईमार्गे ऑक्सिजन आणणार
पंतप्रधानांशी माझी नुकतीच बैठक झाली आहे. त्यात त्यांना ऑक्सिजनची मागणी केली आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. त्यांनी परवानगीही दिली आहे. मात्र, ईशान्येकडील राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास करून रस्ते मार्गे हे ऑक्सिजन आणावं लागणार आहे. परंतु आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे. त्यामुळे रस्तेमार्गे ऑक्सिजन आणणं परवडणारं नाही. त्यामुळे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची पंतप्रधानांनी परवानगी द्यावी. मी फेसबुकवरून तुमच्या माध्यमातून पंतप्रधानांना आवाहन करत आहे. आणि त्यांना पत्र लिहूनही मागणी करणार आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
15 दिवस संचारबंदी
राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. 15 दिवस ही संचारबंदी राहणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच या संचारबंदीतून अत्यावश्यक सुविधा वगळण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.

