करमाळा । प्रतिनिधी :
Karmala Fort
इतिहास :
रावरंभाराव व त्यांचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी इसवीसन १७२७ -१७३० च्या दरम्यान करमाळा किल्ला बांधल्याचा उल्लेख आढळतो. निंबाळकर हे निजामाचे सरदार होते. त्यांच्याकडे असलेल्या जहागिरीत बीड, उस्मानाबाद, जामखेड, खर्डा, भूम, कर्जत, करमाळा या प्रदेशांचा समावेश होता.
पहाण्याची ठिकाणे :
करमाळा बस स्थानकात उतरुन चालत १० मिनिटात आपण किल्ल्यापाशी पोहोचतो. हा भुईकोट असल्याने पूर्णपणे खंदकाने वेढलेला होता, आता त्यावर रस्ता बांधलेला आहे. रस्त्याने किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीत असलेल्या दरवाजातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. स्थानिक लोक याला वेस या नावाने ओळकतात. समोरच काळ्या मारुतीचे मंदिर आहे. मंदिरा जवळ वीरगळ आणि सतीच्या शिळा आपले लक्ष वेधून घेतात. तिथूनच उजव्या बाजूला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे(खोलेश्वर) मंदिर पाहावयास मिळते. मंदिराजवळ भग्न झालेल्या वीरगळी आहेत. मंदिराच्या मागिल बाजूस पुष्कर्णी आहे. पण ती पाहाण्यासाठी पुन्हा वेशीतून बाहेर येऊन डाव्या बाजूला जावे लागते. पुष्कर्णीच्या भिंतींवर नक्षीदार कोनाडे आहेत. एके काळी या कोनाड्यात मुर्ती असाव्यात पण आज ते रिकामे आहेत.
पुष्कर्णी पाहून परत वेशीतून आत आल्यावर मारुती मंदिराच्या समोरच किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दार दगडात बांधलेले असून त्याचा वरचा भाग वीटांनी बांधलेला आहे. त्यात ३ झरोके आहेत. प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस अष्टकोनी बुरुज आहेत. किल्ल्याचा लाकडी दरवाजा आणि त्यावरील लोखण्डी खिळे अजुन शाबूत आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस दरवाजाच्या वर चढून जाण्यासाठी पायर्या आहेत. दरवाजा वरून सध्या किल्ल्यातच वसलेले गाव आणि पसरलेली तटबंदी आणि बुरुज दिसतात. या गावाच्या वाढीमुळे किल्ल्याचे अवशेष लुप्त झालेले किंवा नष्ट झालेले आहेत. दरवाजावरून खाली उतरून उजव्या बाजूला चालत गेल्यावर बांधिव तलाव आहे. तलावात दोन बाजूने उतरण्यासाठी पायर्या आहेत. तलावाच्या काठावर कमानी असलेला छोटेखानी महाल आहे. उन्हाळ्यात तलावाच्या काठावर जमिनी खाली बांधलेल्या या महालामुळे थंडावा मिळत असे. राजघराण्यातील लोक या ठिकाणी विश्रांतीसाठी आणि स्नानासाठी येत असत. या महालातून जानोजीरावांच्या महालात जाण्यासाठी भुमिगत रस्ता आहे. तलाव पाहून पक्क्या रस्त्याने पुढे चालत गेल्यावर कोर्टाची इमारत इतर सरकारी कार्यालय आहेत.
याठिकाणी जानोजीरावांचा महाल होतो. महाल आयताकृती असुन मध्ये मोठे अंगण आहे. अंगणात विहिर आहे. महालाच्या मागच्या बाजूस बाहेर जाण्यासाठी एक छोटा दरवाजा ठेवलेला आहे. महाल पाहून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दुसर्या टोकाच्या तटबंदीत असलेल्या दरवाजापाशी पोहोचतो. याठिकाणी दुहेरी तटबंदी आहे. त्याकाळी बाहेरील तटबंदीतही दरवाजा असावा. आज मात्र त्याचा मागामुस दिसत नाही. दरवाजातून बाहेर पडून तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर खंदकातील विहिरीपाशी पोहोचतो. किल्ल्यात वस्ती आणि घाण असल्याने बाकीचे किल्ल्याचे अवशेष पाहाण्यासाठी तटबंदी व बुरुजावरुन फ़िरावे लागते. किल्ल्याला १८ बुरुज असल्याचा संदर्भ सापडतो. अनेक ठिकाणी तटबंदी उध्वस्त झालेली आहे. किल्ला पूर्ण पाहायला अर्धा ते पाऊण तास पुरेसा आहे.
महाराष्ट्रात असे खूप किल्ले आहेत जे आज उध्दवस्त होत आहेत गड किल्ले म्हणजे हिंदवी स्वराज्याची महाराष्ट्राची शान आहे पण दुर्दैव या कडे शासनाने लक्ष नाही.

