पुणे:-राज्यात पुणे शहराला म्युकरमायकोसिसचा सर्वात जास्त धोका असल्याचे समोर आले आहे. पुण्यात आतापर्यंत ६२० म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या पुण्यात ५६४ रुग्ण म्युकरमायकोसिसवर उपचार घेत आहेत.
महाराष्ट्रात सध्या पुणे काळ्या बुरशीचे केंद्रबिंदू ठरत आहे. पुण्यानंतर नागपूर शहर काळ्या बुरशीशी सामना करणारे राज्यातील दुसरे शहर ठरत आहे. राज्यात आतापर्यंत २१३ काळ्याबुरशीचे रुग्ण बरे झाले आहेत. तर १२० जणांचा मृत्यू झाला आहे.
काळ्या बुरशीचा धोका पुण्यात झपाट्याने होत आहे. पुण्यात आतापर्यंत २९ जण काळ्या बुरशीच्या आजारातून बरे झाले आहेत. तर २७ जणांचा काळ्या बुरशीच्या आजाराने जीव घेतला आहे. नागपूरातही आतापर्यंत २२ जणांनी काळ्या बुरशीवर मात केली आहे.
पुण्याच्या तुलनेच नागपूरात काळ्या बुरशीने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. आतापर्यंत नागपूरात केवळ ४ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे, नागपूर नंतर नांदेड, मुंबई, अहमदनगर आणि सांगली जिल्ह्यांत काळ्या बुरशीचे रुग्ण आढळून आले आहे. नांदेडमध्ये १४२, मुंबईत ११८, अहमदनरमध्ये ११६ आणि सांगली जिल्ह्यात १०१ काळ्या बुरशीच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
म्युकरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीच्या आजाराला नोटेफायबल डिसीज म्हणून आरोग्य विभागाने मान्यात दिली आहे. राज्यात म्युकरमाकोसिसच्या रुग्णांची नोंद पोर्टलवर करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांची चाचणी करण्यात येईल त्यांचे रिपोर्ट नोटिफिकेशनद्वारे कळवले जाणार आहेत.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन – बी (Amphotericin – b) या इंजेक्शनचा ताबाही आता राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने इंजेक्शनचे वाटप केल्यानंतर जिल्हाधिकारी या इंजेक्शवनचा साठा आपल्या ताब्यात घेतील आणि त्यानंतर जेवढी रुग्णसंख्या आहे त्या प्रमाणे इंजेक्शन देण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर जी कारवाई केली होती त्यातून मिळालेल्या निधीचा वापर म्युकरमायकोसिसच्या जनजागृतीसाठी वापरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

