संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):
शहरातील जोर्वे नाका येथील राजश्री कृषी सेवा केंद्राला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून दुकानातील खते, औषधे व बी बियाणे सह दुकान संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुमारे १ कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शोर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वाघापूर येथील शारदा नगरी पतसंस्थेचे माजी चेअरमन व राजश्री उद्योग समूहाचे संचालक सुनील शिंदे यांच्या मालकीचे राजश्री कृषी सेवा केंद्र हे दुकान जोर्वे नाका येथे आहे. शुक्रवारी दुपारी शिंदे हे दुकान बंद करून घरी गेले असता मध्यरात्री त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. रात्रीची वेळ असल्याने ही बाब लक्षात आली नाही, मात्र औषधे व खते यांनी रौद्र रूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांनी घटना ठिकाणी धाव घेतली. नगरपालिका अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र दुकान संपूर्ण जळून खाक झाले.
याप्रकरणी सुनील शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असून अकस्मात घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे, अधिक तपास पोलीस करीत आहे.

