संगमनेर । प्रतिनिधी( ऋषिकेश जगताप):
कोरोना पार्शभूमीवर टाळेबंदी गैरफायदा घेत तालुक्यातील कोठे कमळेश्वर येथे शनिवारी बालविवाह होणार होता. ही माहिती मिळताच हा विवाह रोखण्यात आल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांनी दिली आहे.
शनिवारी कोठे कमळेश्वर गावातील एका मुलासोबत या अल्पवयीन मुलीचा विवाह होणार होता मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सतर्कतेमुळे हा बालविवाह रोखण्यात आला आहे, टाळेबंदीत सर्व दुकाने बंद असूनही विवाहासाठी लागणारी खरेदी वधू वरांनी केली होती.
राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील कोठे कमळेश्वर गावातील १० वीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका मुलासोबत विवाह होणार असल्याची माहिती आम्हाला समजली. संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे याना याबाबत कळविले. त्यांनतर आम्ही तेथे जाऊन मुलीच्या वडिलांची समजूत घातली. कायद्याच्या विरोधात असल्याचे समजावून सांगितले. वडिलांनी हे सर्ब मान्य करून बालविवाह करणार नसल्याचे लेखी दिले आहे. त्यामुळे हा विवाह रोखण्यास यश आले आहे.

