स्वच्छता,पाणीपुरवठा,खरेदी,बांधकाम,कंञाटे आदींसह विविध आक्षेपार्ह बाबींवर बोट ठेवत नगरसेवकांनी पञकार परीषदेतून वाचला गैरव्यवहाराचा पाढा.!!
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
अंबाजोगाई नगरपालिकेत स्वच्छता,पाणीपुरवठा,खरेदी,बांधकाम कंञाटे आदींसह विविध आक्षेपार्ह बाबींवर बोट ठेवत नगरसेवकांनी पञकार परीषदेतून गैरव्यवहाराचा पाढाच वाचला.
नगरसेवक शेख रहीम शेख रज्जाक आणि नगरसेवक सारंग पुजारी यांनी दिनांक 28 जुलै बुधवारी अंबाजोगाईत पञकार परीषदेचे आयोजन केले होते.
या बाबतीत पञकारांना माहिती देताना शेख व पुजारी यांनी सांगितले की, अंबाजोगाई नगरपरिषदेच्या सर्वच विभागात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. याबाबत वेळोवेळी आम्ही लेखी तक्रारी केल्या,वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला,लोकहिताच्या कामाला जाणीवपूर्वक टाळाटाळ करणे, कोरोना महामारीत कोणतेही काम न करता बिले काढणे, गेल्या अनेक वर्षांपासून झारे गल्ली, मणियार गल्ली, धनगर गल्ली, खतीबी स्मशानभूमी, बोरूळा तलाव शेजारी, एपीजे अब्दुल कलाम सभागृहासमोर लाईटची व्यवस्था करण्याचा ठराव घेवूनही पालिकेने नगरसेवक विरोधात असल्याने निधी दिला नाही.
जाणिवपूर्वक टाळाटाळ केली. तसेच प्रभाग क्रमांक 2 व 3 साठी आम्ही लेखी निवेदन देवूनही निधी दिला नाही. कोरोना काळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. आवश्यक तेवढे सॅनिटायझर केले नाही, फॉगिंग मशीन वापरले नाहीत. यामुळे सध्या अंबाजोगाईत डेंग्यूचे पेशंट वाढले आहेत,सर्व बाबतीत आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न केला,पुर्ण बहुमत नसल्याने आम्ही चर्चेला आणलेले विषय यांचे ठराव घेण्यात आले नाहीत.या सर्व बाबींचे निराकरण व्हावे खरी वस्तुस्थिती जनतेसमोर येण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती,
नगर सेवक शेख व पुजारी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, पाणी पुरवठा विभागात ही मोठा गैरव्यवहार आहे.कारखाना फिल्टर येथील दोन विहिरीतील गाळ काढला याचे बील 18 लाख 50 हजार एवढे दाखवले आहे, याच रक्कमेमध्ये चार विहिरी तयार झाल्या असत्या. परंतू पालिकेला गुत्तेदार पोसण्यासाठी हा उठाठेव झालेला आहे. मागील 2017 ला हेच काम 5 लाख 16 हजारात केल्याचे आढळून येते.
शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये एपीजे अब्दुल कलाम सभाग्रहा समोर तिर्थ् क्षेत्र विकास योजनेतून तयार केलेल्या जुन्याच नालीची डागडुजी टेंडर न करता 20 लाख 31 हजार 614 रूपये एवढे बील अदा करण्यात आले आहे.शहराची स्वच्छता करण्यासाठी ज्या एजन्सीला काम दिले होते त्यांनी अंबाजोगाई शहराची स्वच्छता तर केली परंतू ती करत असताना यात लाखो रूपयांचे बीले काढली.या गैरव्यवहारात मुख्याधिकारी अभियंता,कंत्राटदार, नगराध्यक्षा यांनी आपसात संगनमत करून स्वच्छता कंत्राटात लाखो रूपयांचा अपहार केला.व हे करत असताना अंबाजोगाई करांच्या विश्वासालापण तडा दिला आहे.
यात नालेसफाई प्रती महिना 10 लाख 28 हजार 736 रूपये,घंटागाडी प्रती महिना10 लाख 49 हजार 200 रूपये,फॉगिंग व आबेटींग करणे यासाठी 3 लाख 50 हजार रूपये,सर्वे नंबर 17 मध्ये कचरा विलगीकरण 2 लाख 50 हजार असा प्रशासकीय मान्यतेपेक्षा वारेमाप खर्च दाखवून सुमारे 90 लाख 54 हजार 705 रूपये जास्तीचे पैसे एकाच कंञाटात दिले आहेत. वजन पावत्यात तफावत आढळून येते,कोरोना काळात संचारबंदी असताना 74 लाख 3 हजार 557 रूपये खर्च दाखवला आहे,जेसीबी नगरपालिकेचा अन् फायदा कंत्राटदाराचा केला आहे,नगरपरिषदेच्या कायमस्वरूपी कर्मचार्यांचा वापर कंत्राटदारासाठी केला आहे,घंटागाडी नगरपालिकेची आणि फायदा कंत्राटदाराचा केला आहे,सर्वच प्रकरणात प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार करुन खोटी देयके अदा केल्याचे आमच्या निदर्शनास आले.तसेच नाल्यांमधील गाळ काढण्याचे कंत्राट हे गाळ-कच-याच्या वजणाप्रमाणे देण्यात आले आहे.सदरील 6 महिन्यामध्ये गाळाचे वजन व अदा देयक एकसारखेच आहेत. सदरील गाळाच्या वजनामध्ये सहा महिण्यांमध्ये 01 ग्राम वजनाचादेखील फरक पडला नाही हे संशयास्पद आहे व गंभीर बाब आहे.
सदरील अधिकची देयके अदा करताना यासाठी कोणताही ठराव अथवा परवाणगी घेतल्याचे आम्हाला दिसून आले नाही.यावरून रेकॉर्ड हे बनावट असल्याचे दिसते स्वतःच्या अधिक फायद्यासाठी संगनमताने न.प.मुख्याधिकारी, कर्मचारी व नगराध्यक्ष यानी स्वच्छता कंत्राटामध्ये खोटे व बनावट अभिलेख तयार करून सदरील कामामध्ये शासकिय निधिचा गैरवापर करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचे कागदोपत्री पुराव्यावरून स्पष्ट दिसून येत आहे.व या बाबत अंबाजोगाई नगरपरिषदेचे जेष्ठ नगरसेवक शेख रहीम शेख रज्जाक व सारंग पुजारी यांनी पूर्ण कागदोपत्री पुराव्यासह तक्रार जिल्हाधिकारी,बीड. यांच्या कडे केली आहे.त्यामुळे सदरील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवुन मुद्यानिहाय सखोल चौकशी करुन सदर प्रकरणातील दोषी यांच्यावर तात्काळ कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी व संबंधीत दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश द्यावेत,अशी विनंती अंबाजोगाई नगरपरिषदेचे जेष्ठ नगरसेवक शेख रहीम शेख रज्जाक व सारंग अरुण पुजारी यांनी पञकार परीषदेतून केलेली आहे.
पूर्वीच्या तक्रारी बाबत माहिती देताना शेख व पुजारी यांनी सांगितले की,भूखंड, अनाधिकृत बांधकाम, बोगस ठराव याबाबत ते संबंधितांविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यात यावी,सर्वसाधारण सभा नियमानुसार घेतल्या नाहीत,तर त्या 5,8,3,9 महिन्यांच्या अंतराने घेतल्या.20 वर्षांपासून एकच सूचक आहे.नोव्हेंबर महिन्यात संप चालू असताना स्वच्छता कंत्राटाची देयके अदा केली याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार सुनावणी सुरू आहे.
तर अपर जिल्हाधिकारी यांचेकडे मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहातील खुर्ची खरेदी बाबत आम्ही तक्रार केली होती त्याची सुनावणी चालू आहे,सर्वे नंबर 358, 359 भूखंडाचे आरक्षण बदल करणे हे प्रकरण जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद येथील खंडपीठात सुनावणी सुरू आहे.तर या सर्वच प्रकरणात आमच्या नेत्या आ.सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी थेट मुख्यमंञ्यांकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे.तसेच आम्ही जिल्हाधिकारी यांना सर्व पुराव्यानिशी निवेदने दिले आहेत.
आगामी काळात जनतेच्या विविध प्रश्नावर लोकशाही मार्गाने जनआंदोलन करणार आहोत अशी माहिती नगरसेवक शेख रहीम शेख रज्जाक व नगरसेवक सारंग पुजारी यांनी दिली.

