एरंडोल
भालगाव फाट्याजवळील दुर्घटना...
एरंडोल- पारोळ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने समोरून येणा-या मोटरसायकलला जोरदार दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोन युवक जागीच ठार झाले.हा अपघात काल (ता.२२) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील भालगाव फाट्याजवळ असलेल्या शहा पेट्रोल पंपाजवळ झाला.अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला.राखीपौर्णिमेच्या दिवशीच दोन तरुणांवर काळाने घाला घातल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
राखीपौर्णिमेच्या दिवशीच गावावर शोककळा....
याबाबत माहिती अशी,की जळू (ता.एरंडोल) येथील युवक इंद्रसिंग दगडू पाटील (वय २८) आणि भूषण कौतिक पाटील (वय २२) हे दोन युवक काल रात्री बारा वाजेच्या सुमारास एरंडोल कडून मोटर सायकल क्रमांक एम.एच.२० एफ.क्यू ७५०५ ने घरी जळू येथे येत होते.राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव फाट्याजवळ असलेल्या शहा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटर सायकलला पारोळ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणा-या ट्रक क्रमांक एम.एच.१९ झेड ४५२७ ने समोरून जोरदार धडक दिल्यामुळे मोटरसायकलवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रकचालक ट्रक जागेवर सोडून फरार झाला.अपघात झाल्यानंतर पंपावरील कर्मचा-यांनी घटनेची माहिती पोलिसाना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपनिरीक्षक अविनाश दहिफळे,पोलीस कर्मचारी अकिल मुजावर,संदीप सातपुते,अनिल पाटील यांचेसह पोलीस कर्मचारी तसेच पातरखेडे येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली.
जळू येथे देखील युवकांच्या अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थ व युवकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.दोन्ही युवकांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कैलास पाटील,डॉ.मुकेश चौधरी यांनी दोन्ही युवकांच्या प्रेतांची शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.दोन्ही युवकांवर दुपारी शोकाकुल वातावरणात जळू येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी युवकांच्या नातेवाईकानी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावली होती.दोन युवकांचा अकाली अपघातात मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली होती.
याबाबत नरेंद्रसिंग भगवान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विलास पाटील तपास करीत आहे.अपघातात मयात झालेला भूषण औरंगाबाद येथे कंपनीत नौकारीस होता.त्याच्या पच्छात आई,वडील आणि भाऊ असा परिवार आहे.तर इंद्रसिंग पाटील हा शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.त्याच्या पच्छात आई,भाऊ,पत्नी व तीन वर्ष वयाचा मुलगा आणि एक वर्ष वयाची मुलगी असा परिवार आहे.घरातील दोन कर्त्या युवकांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे गावात हालहाल व्यक्त केली जात आहे.

