पाथर्डी । प्रतिनिधी :
परवा रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात नद्या, ओढे, नाले एक झाले ; मात्र याचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या गावांना बसला. पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील गोरक्ष रामभाऊ कारखेले यांचे घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले; मात्र त्यांच्या घरातील भगवद्गीता पुराच्या पाण्यात वाहून नदीपात्रात येऊन रात्रभर पाण्यात राहून सुद्धा भिजली नाही व पाण्यावर तरंगत राहिली.
सकाळी शोधकार्य सुरू असताना आदर्श शिक्षक विजय कारखेले यांना ती पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. विजय कारखेले यांनी सदर भगवद्गीता सुरक्षितपणे पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढली.सदर भगवद्गीता रात्रभर पाण्यात राहून सुद्धा थोडीही भिजली नाही व तिचे एकही पान खराब झाले नाही. ती सुरक्षितपणे पाण्यावर तरंगत होती.
" जळी दगडासहीत वह्या, तारियल्या जैस्या लाह्या" या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय या निमित्ताने अनुभवयास मिळाला.

