शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा प्रतिनिधि दिपक हरिश्चंद्रे.
मुंबई:राज्यात कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होत असताना नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजे येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यभरातील मंदिरे भाविकांसाठी खुली होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडणार असली तरी भाविकांना कोरोना विषयक नियम पाळावे लागणार आहेत.
कोरोना संसर्गाची पहिली लाट नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने प्रार्थनास्थळे खुली केली होती. मात्र, दुसरी लाट सुरू झाल्यानंतर प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. मध्यंतरी विरोधी पक्ष भाजपने मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मंदिर भाविकांसाठी खुली करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी सरकारने मंदिरांबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता.आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावल्याने सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून भक्तांना मंदिरात जाऊन देवदर्शन घेता येणार आहे. मंदिराप्रमाणे अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळेही नवरात्रीपासून खुली होतील.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (प्रतिनिधी )📲7350591600

