प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे . पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळ्या ठिक्कर पडल्या आहेत , तर कापसाच्या वाती बनल्या . काही भागात कापसाचे बोंडेदेखील सडून गेली आहेत . हातात येणारे पीक डोळ्यासमोर मातीमोल झाल्याने शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे.
केज तालुक्यातील सर्वच मंडळात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे . अनेक शेतात कापूस फुटून होता , तर सोयाबीन कापणीवर आले होते . काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून त्याच्या गंज्या शेतात उभ्या केल्या होत्या . अशातच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आणि शेतकरी हादरून गेला . अगदी हाती येणारे पीक पावसाने मातीमोल केले .
अनेक शेतकऱ्यांचा कापूस शेतातच ओला झाला असून सोयाबीनदेखील काळे पडल्याने उत्पन्नात फार मोठी घट येण्याची चिन्हे आहेत . अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी बँकांसह खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन खरीप हंगामाची सोय केली . यंदा चांगले उत्पादन होईल , असा अंदाज होता . शेतकऱ्यांनाही तीच आशा होती . पिकाची अवस्था अतिशय चांगली होती . मात्र नियतीला ते पहावले नाही . या भागात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे . २० सप्टेंबरच्या रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला . २१ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत सुरूच होता . त्यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली . शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले.
अनेक शेतांमधील पिकात अजूनही पाण्याचे डबके साचून आहे . पिकांवर बुरशीजन्य आजाराचे आक्रमण होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
केज तालुक्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन कंबरडे मोडले आहे शासनाने तात्काळ हेक्टरी सरसकट पन्नास हजार रुपये मदत केली तरच शेतकरी या संकटातून सावरू शकतो.

