भावनावश, गंभीर होऊन विश्वामित्र सांगु लागले, "भगवान ब्रम्हदेव सृष्टीनिर्मितीच्या कार्यात मग्न असतांना त्यांच्या मनांत आले, आपण एक अप्रतीम मानवी शिल्प, अलौकीक लावण्याची रेखा तयार करावी. ब्रम्हदेवांनी सार्या वस्तूतील सौंदर्यकरण एकत्र करुन एका सुंदर रमणीची निर्मिती केली. त्यात चैतन्य ओतण्यापुर्वी ब्रम्हदेव कृतार्थपणे म्हणाले, "ही अहिल्या..! हलय नसलेली...! निंदनीय असे तिच्यात काही नसावे म्हणुन आजपासुन हिचे नांव अहल्या.... अहल्या... अहल्या."
चैतन्यमयी झालेले ते शिल्प मेनका आणि महर्षी वध्रश्वच्या पोटी जन्माला आली. बालिकेच्या जन्मानंतर मेनकेने तीला ब्रम्हदेवाजवळ दिली. ब्रम्हदेवांनी लहानग्या अहल्येला महर्षी गौतमांच्या आश्रमात ठेवली. अहल्या वयात आल्यावर गौतममुनींनी तिला ब्रम्हदेवांकडे नेऊन पोहचवली.
देव लोकांतील अनेक देवांना या लावण्यमयी अहल्याचा मोह पडला. विशेषतः देवराज इंद्रानी तिच्याशी विवाह करण्याचा विचार पक्का केला. परंतु ब्रम्हदेवांच्या मनांत तीचा विवाह गौतमांशीच करायचा बेत होता, कारण तीच्यासारखी निष्कलंक सत्वशील तरुणीला महर्षी गौतमासारखा शुध्द आचारणाचा व सात्विक स्वभावाचा त्रृषीच योग्य पती आहे असे त्यांना वाटत होते.
ब्रम्हदेवाच्या या निर्णयामुळे इंद्रासहित सर्व देव असंतुष्ट झालेत. अखेरीस ब्रम्हदेवाने एक "पण" मांडला. जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा घालुन प्रथम माझ्याजवळ येईल, त्याच्याशी अहिल्येचा विवाह केल्या जाईल. सर्व देव आपापल्या वाहनावर बसुन पृथ्वी प्रदक्षिणेसाठी घाईने निघुन गेलेत. देवराज इंद्र सुध्दा ऐरावतावर बसुन मोठ्या रुबाबाने निघाले. बिचारा साधासुधा त्रृषी महर्षी गौतम! त्यांच्या जवळ कोणते वाहन? ते पायीच निघाले. चालतां चालतां वाटेत एक गाय दिसली. त्यांनी विचार केला, "गोमाता हीच पृथ्वी होय!" गौतमांनी गाईला नमस्कार करुन प्रदक्षिणा घातली आणि सर्वांच्या आधी ब्रम्हदेवाजवळ येऊन पोहचले. ब्रम्हदेवांना त्यांच्या बुध्दीचे कौतुक वाटले, त्यांनी लगेच गौतमशी अहल्याचा विवाह लावुन दिला.
सर्व देवतांच्या आधीच ऐरावतावर बसुन इंद्र आले, पण त्याआधीच अहल्येचा विवाह गौतमशी झाल्याचे पाहुन ते अतिशय निराश झाले. त्यांच्या मनांत सूडाची भावना पेटल्या गेली.
मिथिलेच्या परिसरांत गौतमांनी सुंदर आश्रम बांधुन तिथे पर्णकुटीत अहल्यासह राहुं लागलेत. गौतमांच्या तपस्येने तपोबल वाढुन आश्रमाच्या सौंदर्याला तपोबलाचे दिव्य प्राप्त झाले. आश्रमाच्या विकासाने आणि तेजस्वितेने देवदेवता दिपुन गेलेत. गौतमाच्या आश्रमाला देवलोकी फार मान मिळू लागला आणि देवराज इंद्राचा मत्सर वाढू लागला.
क्रमशः
मुकेश

