बेलापूर । (प्रतिनिधी ): -श्रीरामपुर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असुन या या शेतकऱ्याचे अश्रू पूसण्यासाठी कुणी पुढे येईल का ? असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते सुधाकर खंडागळे यांनी केला आहे या बाबत पत्रकारांशी बोलताना सुधाकर खंडागळे म्हणाले की शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी असणारी २४ तास ६५ मीली मिटर पावसाची असणारी अट शिथील करावी . शेतकरी सतत कशाचे ना कशाचे बळी ठरत असतात कधी भावाचे कधी निसर्गाचे. भावाचा घाव शेतकरी सहनही करु शकेल, परंतु निसर्गाची मार सहन करण्याची ताकद आज शेतकरी वर्गात राहीलेली नाही.
अगोदरच तुटपुंजी शेती त्यात त्यावर होणारा खर्च अन त्यातून मिळणारे उत्पन्न याचा मेळ घालता घालता तो मेटाकुटीस आलेला असतानाच निसर्गाचाही मोठा फटका सहन करावा लागत आहे या वेळेस कसेतरी पिक आलेले असताना दसरा दिपावलीचे स्वप्न पहात असतानाच नुकत्याच आलेल्या पावसाने त्यांच्या स्वप्नाची धुळधाण झाली सोयाबीण कपाशी मका घास फळबागा पाण्यात पोहोत आहे आता दाद कुणाकडे मागायची ? असा सवाल खंडागळे यांनी केला असुन शेतकऱ्यांच्या मदतीला मायबाप सरकार धावुन येईल का ? गेल्या आठ दिवसापासून परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे त्यामुळे सर्व पिके सडली आहे .
नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुधाकर खंडागळे यानी केली आहे

