शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार,०८ नोव्हेंबर , २०२१
राहुरी : सक्तीची वीजबिल वसुली थांबवून वीजबिल माफ करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष, विविध सामाजिक संघटना व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने राहुरी शहरातील बाजार समिती समोर, नगर मनमाड रोडवर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या रस्ता रोको आंदोलनाप्रसंगी बोलताना सुरेशराव लांबे म्हणाले की, प्रहार जनशक्ती पक्ष हा महाविकास आघाडी सरकार सोबत सत्तेत आहे. परंतु शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तेथे प्रहार करण्याचे तंत्र ना. बच्चु कडु यांचे असल्याने आज हे सरकारविरोधी आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले. पुढे बोलताना लांबे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी, सततचा लॉकडाऊन, जागतीक संकटामुळे कोणत्याही शेतीमालाला भाव नाही, दूधाला भाव नाही या विविध समस्यांमुळे शेतकरी हैराण होवून मेटाकुटीस आलेला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल, रासायनिक खते, पशुखाद्य, कृषिसेवा औषधे, वाढती मजुरी इत्यादी बाबींचे भाव गेल्या दोन वर्षात प्रचंड वाढलेले आहेत. त्यामुळे शेतीधंदा संपूर्ण पणे कोलमडून गेलेला आहे. रोज कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा भयानक परिस्थितीला शेतकरी वर्ग सामोरा जात आहे. अशातच महावितरण कंपनीने शेतक-यांकडून कृषी पंपाची सक्तीची विजबील वसूली सुरु केलेली आहे. विजबिल वसूली करताना शेती कृषि पंपांचा विज पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे जे काही पिके शेतात उभी आहेत, ते पिकेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी उध्दवस्त करण्याचे पाप राहुरी तालुक्यात होत आहे. तरी सर्व महावितरण अधिकार्यांनी शेती पंपाचे ट्रान्सफार्मर बंद करू नये असे आदेश त्वरीत द्यावेत व शेतक-यांचे संपूर्ण विज बिल माफ करावे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांची झालेली नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी कमीत कमी २५ हजार रुपये सर्व शेतक-यांच्या खात्यात जमा करावे अशी आंदोलनाव्दारे शासनाकडे मागणी केली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

