shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशाचे गृहमंत्री अमित शहा नगरला तर राहुरीतील मोक्कातील आरोपींचे गज तोडून पलायन..!तीन जेरबंद, दोन फरार..!

देवळाली प्रवरा । प्रतिनिधी : देशाचे गृहमंत्री अमित शहा नगर जिल्हा दौर्‍यावर असतानाच राहुरी येथील मोक्का गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या गुन्हेगारांसह पाच जणांनी जेलमधून पळ काढल्याने एकच खळबळ उडाली. जेलच्या पाठीमागिल बाजुला असलेल्या खिडकीचे गज कापून पळून जाणार्‍या पाच जणांपैकी तिघांना पोलिसांनी पकडले आहे. तर उर्वरीत दोघे आरोपी फरार झाल्याने पोलिस प्रशासनाकडून जिल्हाभर शोधा शोध सुरू झालेली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी तातडीने धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. तिसरा आरोपी जालिंदर सगळगिळे हा मनमाड रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला.

नगर व पुणे जिल्ह्यामध्ये खळबळ उडवून टाकणारे सागर भांड टोळीतील आरोपींना दरोडा प्रकरणात पोलिसांनी शिताफीने पकडले होते. यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेला सागर भांड व त्याच्या साथीदारांनी अनेक ठिकाणी दरोडे, चोरी, दहशत निर्माण करणे, गावठी कट्यांचा वापर करून सर्वसामान्यांना जेरीस आणणे आदी प्रकार केल्याचे विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून समोर आले होते. अशा आरोपींना राहुरी पोलिस ठाण्यात असलेल्या तुरूंगात ठेवण्यात आलेले होते.

 

दरम्यान, शुक्रवारी मध्य रात्रीच्या वेळी भांड प्रकरणातील आरोपींनी पळून जाण्याचा बेत आखला. जेलमध्ये पाठीमागिल बाजुला असलेल्या खिडकीचे गज कापण्यात आले. आरोपींनी रात्रीतून जेलमधून पळ काढला. दरम्यान, पाच जण लपून पळत असल्याचे रात्रीची गस्त घालणार्‍या पोलिस प्रशासनाच्या लक्षात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हवालदार आदिनाथ पाखरे, सचिन ताजणे, दीपक फुंदे, विकास साळवे, देविदास कोकाटे, रंगनाथ ताके, कोळगे यांनी पाणी टाकी परिसरात सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. यामध्ये सागर भांड, किरण अजबे, जालिंदर सगळगिळे हे तिघे जण पोलिसांच्या हाती लागले. तर रविंद्र उर्फ रवी पोपट लोंढे, नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी हे आरोपी फरार झालेले आहे.


राहुरी पोलिस ठाण्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. प्रकरणामध्ये सागर भांड टोळीतील नितिन उर्फ सोन्या माळी यांच्यावर मोक्का अंतर्गत नुकतीच कारवाई करण्यात आलेली होती.

गृहमंत्री शहा हे नगर जिल्हा दौर्‍यावर असल्याने पोलिस प्रशासन व्यस्त होते. त्याचा गैरफायदा घेत संबंधित आरोपींनी पळून जाण्याचा बेत आखल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेच्या कामकाजाबाबत टीका होत आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील या प्रकरणा बाबत काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ब्रिटीशकालीन कारागृहाची सुरक्षा 18 वर्षांनी भेदली...
      
अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ब्रिटिशकालीन राहुरीच्या कारागृहाची सुरक्षित तटबंदी गेल्या 19 वर्षापुर्वी ज्ञानदेव खांदे सह अदिवासी समाजाचा सराईत गुन्हेगार या दोघांनी कारागृहाच्या छताचे गज कापुन पलायन केले होते. त्याच वेळी जेलची सुरक्षा मजबुत करणे गरजेचे होते. आज पुन्हा कारागृहाची सुरक्षा भेदून एकाच वेळी पाच कैद्यांनी पलायन करण्याची दुसरी घटना आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आज सकाळी कारागृहाची पाहणी केली. राहुरी पोलीस ठाण्याची पाच व स्थानिक गुन्हे शाखेची दोन अशी सात पोलीस पथके पळालेल्या तीन गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

असा शिजला पलायनाचा कट...
           
राहुरी कारागृहात बरॅक नंबर चार मध्ये एकूण सतरा कैदी ठेवले आहेत. त्यात टोळी प्रमुख सागर भांड सह पाच जण न्यायालयीन कोठडीत होते. गेल्या एक आठवड्यापासुन सागर भांड टोळीचा मिञ पोलिस ठाण्यात चकरा मारत होता. त्यानेच भेटीच्या निमित्ताने व्हँक्स ब्लेड पुरविले असल्याचे समजते. पाच आरोपी फरार झाल्यानंतर काही वेळातच भांड याच्या मिञास राहुरी पोलिसांनी पोलिस ठाण्याजवळून ताब्यात घेतले आहे. या मिञाने पळून जाण्यास मदत केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारागृहाच्या मागील भिंतीच्या छता जवळील खिडकीचे नऊ पैकी तीन गज कापण्यात आले. बरॅक मधील इतर कैद्यांना धाक, दहशत निर्माण करुन, टोळीतील पाच जण आज (शनिवारी) पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी खिडकीतून बाहेर पडले. बाहेरील लोखंडी जाळी तोडून, कारागृहाची सुरक्षा भेदून पलायन केले.

!
          कारागृहाच्या समोरच्या बाजूने रखवाली करणार्‍या पोलीस कर्मचाऱ्यांना कैदी पळाल्याची अजिबात खबर लागली नाही. दोन कैदी नगर- मनमाड रस्ता ओलांडून राहुरी न्यायालयाच्या बाजूच्या रस्त्याने पळतांना पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाला दिसले. पोलीस कॉन्स्टेबल रंगनाथ ताके, दीपक फुंदे, देविदास कोकाटे, विकास साळवे यांनी पळणाऱ्या दोघांचा पाठलाग केला. टोळी प्रमुख सागर भांड व किरण आजबे यांना अवघ्या पंधरा मिनिटात पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. नंतर पोलिसांना कैद्यांनी पलायन केल्याचे लक्षात आले. तर जालिंदर सगळगिळे हा राहुरी रेल्वे स्थानकावरुन मिळालेल्या रेल्वेने मनमाडच्या दिशेने गेल्याचे समजताच पोलिसांनी मनमाड रेल्वे स्थानकावर सापळा लावला पोलिसांच्या सापळ्यात जालिंदर सगळगिळे हा अलगद अडकला. दुपारी 3 वा. सगळगिळे यास ताब्यात घेण्यात आले.

टोळी प्रमुख सागर भांड पोलीस पुत्र...!
            विशेष म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड याचे वडील पुणे पोलिस दलामध्ये कार्यरत होते. या टोळीवरील गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन, पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, राहुरीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यामार्फत पाठविला होता. त्यास, नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी मागील आठवड्यात मंजुरी दिली.

सागर भांडसह टोळीवर 27 गुन्हे...!
           टोळी प्रमुख सागर भांड याच्यावर राहुरी, एमआयडीसी, कोतवाली, भिंगार कॅम्प, शिक्रापूर, संगमनेर शहर, सुपा येथील पोलिस ठाण्यात एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. रवी लोंढे याच्यावर राहुरी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. नितीन उर्फ सोन्या माळी याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. किरण आजबे याच्यावर कोपरगाव, राहाता, शिर्डी, राहुरी पोलीस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. जालिंदर सगळगिळे याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.
close