प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज निवडणूक आयोग राज्यातील २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका खुल्या प्रवर्गातून घेण्याची शक्यता आहे. तर उर्वरीत ओपन व एस सी साठी सुटलेल्या जागेमध्ये २१ तारखेलाच मतदान होण्याची शक्यता आहे .
त्याचा कार्यक्रम निवडणूक आयोग आज जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी देखील राज्य निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल असे स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये ओबीसी आरक्षणाची निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशा स्वरूपाचा ठराव देखील मंत्रिमंडळाने केला होता, मात्र निवडणूक रद्द करण्यासंदर्भात गुरुवारी रात्री पर्यंत आयोगाला पत्र मिळाले नव्हते असे सांगितले जात आहे.
अर्थात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ठरावानंतर निवडणुका पुढे ढकलण्यासाठी कारणे कोणती द्यायची? या संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणूक आयोगाला सरकार पत्र देण्याची शक्यता आहे. फक्त ओमीक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव हे कारण दिले तर निवडणूक आयोग विचार करेल अशी शक्यता नाही.
दरम्यान तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातीलही निवडणूक पुढे ढकलावी. तामिळनाडूमध्ये मागील वर्षी अशाच प्रकारे राज्य मंत्रिमंडळाने निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला विनंती केली होती. तेव्हा तेथील निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी राज्य सरकार करू शकते.

