लातूर :-
श्रीपादांनी आजोबा बापन्नाचार्यांना सांगितले की माझ्या पुढील नरसिंह सरस्वती अवतारात तुम्ही मला काशी क्षेत्रात गुरू कृष्ण सरस्वती रुपात सन्यास दीक्षा द्याल. श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज इस १३७८ साली अवतरले व ९ वर्षांनी म्हणजे इस १३८७ च्या सुमारास ते लाड कारंजे येथून काशी क्षेत्राकडे
निघाले. तत्पूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ इस २५ मे १३३६ ला पिठापुरहून काशी क्षेत्रात आले. श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज काशी क्षेत्रात असताना कबीर इस१३९८ साली अवतरले. कबीरांचे गुरू हे रामानंद स्वामी.
आता एका रहस्याकडे वळुयात. इस १३३६ साली पळणी स्वामी ३०० वर्षांचे होते तेही विद्यमान शरीरात. ते दर ३०० वर्षांनी शरीर बदलत. म्हणजे ही रामानंद परंपरा शरीर बदलणारी आहे. महेबुब सुभानी यांनी साईबाबांना ८ वर्षे स्वतः जवळ ठेवून साईबाबांना परत पाथरी येथे घरी आणून सोडले तेव्हा साईबाबा १२ वर्षांचे होते ( इस १८४६). त्यावेळी श्री गोपालराव माधवराव देशमुख वेंकुशाह महाविष्णू बाबासाहेब केशवराज यांना अहमदाबाद येथे आदेश झाला की तुम्ही रामानंद आहात व तुमचा शिष्य कबीर हा पाथरीत आहे, तुम्ही तात्काळ निघावे. या गोपालरावांनी साधारणपणे इस १८५० च्या आसपास शरीर सोडलं असावं.
ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म इस १२७५ सालातील भाद्रपद अनघाष्टमी. त्यांचे वडील विठ्ठलपंतांचा जन्म साधारणतः १२५० मधील असावा. विठ्ठलपंतांचे गुरू हे काशीतील रामानंद स्वामी जे कबीरांचेही गुरू. आता कबीर तर इस १३९८ ला जन्मले. कबीर दहा-बारा वर्षांचे असताना म्हणजे इस १४१० च्या दरम्यान त्यांना काशीत दशाश्वमेध घाटावर रामानंदांकडून दीक्षा मिळाली. म्हणजे यावेळी रामानंदांनी वयाचे किमान २१० वर्ष क्रॉस केले असावेत.
नामदेव महाराज इस १२७० मध्ये जन्मले. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी पूर्वी म्हणजे १२९६ पूर्वी उत्तर भारत यात्रा नामदेवांसह केली. साहजिकच काशी क्षेत्रात त्यांनी रामानंद स्वामींचं दर्शन भेट नक्की घेतली असणार. नामदेवांना औंढ्या नागनाथ येथे विसोबा खेचर गुरू भेटले. हेच विसोबा नंतर कुरवपूर क्षेत्रात प्रारब्ध कर्माने म्हणजे भावंडांना त्रास दिल्याने मंदबुद्धी आंजनेय नावाने जन्मले. आत्महत्या करायला कृष्णामाईकडे गेल्यावर श्रीपादांनी यांचा उद्धार केला व तसेच यांच्या आईला अंबिकेला श्रीगुरू नरसिंह सरस्वती अवतारात स्वतःची आई करून घेतले.
आता खऱ्या गमती अशा आहेत की श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीगुरू, स्वामी समर्थ आदी सर्व शिवस्वरूप आणि या सर्व अवतारात यांचे गुरू विष्णू स्वरूप. हा आदर्श यांना भक्तांसमोर ठेवायचाय आणि कळत नकळत अगदी सहजपणे सर्वांना अद्वैताकडे ओढायचंय. रामानंद ते आताच्या सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांच्या पर्यंत हीच
"केशवराज महाविष्णू वेंकुसा" ही गुरू परंपरा सुरू आहे.
नामदेव महाराज लिहितात..
देह जावो अथवा राहो पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥
चरण न सोडीं सर्वथा। आण तुझी पंढरिनाथा ॥२॥
वदनीं तुझें मंगलनाम हृदयीं अखंडित प्रेम ॥३॥
नामा ह्मणे केशवराजा केला पण हा चालवीं माझा ॥४॥
तोच हा "केशवराज"... श्री गोपालबाबा शरीराने समाधिस्थ झाले आहेत पण "गुरू केशवराव" परंपरा अनुस्यूत सुरू आहे.
हभप बापु महाराज

