दक्षिण आफ्रिकेत भारताचा संघ अजूनपर्यंत एकदाही कसोटी मालिका जिंकू शकला नाही. परंतु सेंच्युरीयन येथे झालेला पहिला कसोटी आपल्या नावे केल्या नंतर टिम इंडियाला जोहान्सबर्गच्या वाँडरर्सवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिका खिशात घालून आपल्या विजयी शिरपेचात आणखी एक तुरा खोवून घेण्याची नामी संधी चालून आली आहे. सेंच्युरीयनवरही भारताने कधीही कसोटी सामना जिंकला नव्हता. मात्र या दौऱ्यात ती कमीही दूर झाली असून दक्षिण आफ्रिकेतील वाँडरर्सचे मैदान भारतासाठी नेहमी फलदायी ठरले असून याच मैदानावर आपली मागील तिस वर्ष अपूर्ण राहिलेले मालिका विजयाची भूक पूर्ण करण्याची सुवर्णसंधी टिम इंडिया पुढे दोन्ही हात जोडून उभी आहे.
वाँडरर्सवर भारताने आजवर पाच सामने खेळले असून त्यातील दोन जिंकले आहेत तर तीन अनिर्णित राहिले आहेत. जगातलं हे एकमेव मैदान आहे की येथे भारताची कामगिरी दर वेळी चांगलीच होते. भारताचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्वतःचे पहिले कसोटी शतक याच मैदानावर ठोकले होते. त्याचबरोबर सन २००६ मध्ये द्रविडच्याच नेतृत्वात भारताने दक्षिण आफ्रिकेतील आपला पहिला कसोटी विजय वाँडरर्सवरच साजरा केला होता. सन २०१८ मध्ये भारत दक्षिण आफ्रिकेत भले दोन - एक असे पराभूत झाले होते, मात्र वॉडरर्सवर विजय मिळवून तेथे न हारण्याची आपली परंपरा कायम राखली होती. वाँडरर्सच्या खेळपट्टीचं वैशिष्टये म्हणजे ती नेहमी भारताच्या गोलंदाजांना मदत करत आली असून यंदाही तसेच होण्याची शक्यता आहे.
ही खेळपट्टी सीम व स्विंग करणाऱ्या गोलंदाजांना सहाय्य करते. त्यातच भारताकडे बुमराहा, शमी, सिराज व ठाकूर याच धाटणीचे गोलंदाज असून उमेश यादवलाही संघात समाविष्ट करण्याची दुसरी विचारधाराही काही क्रिकेट तज्ञ व्यक्त करत आहेत. परंतु त्यासाठी आश्विनला संघाबाहेर बसवावे लागेल. मात्र मागील कसोटीत संथ षटक गतीचा फटका एक गुण गमविण्यात बसला असल्याने वेळ खाणारे पाच जलदगती गोलंदाज खेळविण्याची चाल भारत खेळणार नाही. शिवाय आश्विनच्या नावे पाच कसोटी शतके असल्याने त्याला बसवून हनुमान विहारीला खेळविण्याचा जुगार होण्याची शक्यता कमीच वाटते.
हाशिम आमला, एबी डिव्हीलर्स, फाफ ड्यू फ्लेसिस यांच्या निवृत्ती नंतर कमजोर झालेली दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सेंच्युरियन कसोटीत साफ कोलमडली होती. १९७ व १९१ धावाच त्यांना जमा करता आल्याने त्यांना ११३ धावांचा मोठा पराभव पत्करावा लागला होता. हा धक्का कमी की काय म्हणून त्यांचा भरवशाचा फलंदाज व यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकने पहिल्या कसोटी नंतर अकाली निवृत्ती घेतल्याने आफ्रिकन गोटात मोठी चलबिचल झाली आहे. वास्तविक दोन्ही डावात डिकॉक विशेष काही करू शकला नव्हता. परंतु पुढे जाऊन चांगली कामगिरी करण्याची क्षमता त्याच्यात नक्कीच होती.
त्यामुळे जोमात असलेल्या भारतीय गोलंदाजांना रोखण्याचे अवघड काम कर्णधार डिन एल्गर, उपकर्णधार टेंबा बवुमा व एडन मार्कराम यांच्यावर असणार आहे.
पहिली कसोटी जिंकून भारत उंच मनोधैर्याने या सामन्यात उतरणार आहे. भारताकडून के एल राहुल, मयंक अग्रवाल व अजिंक्य राहाणेने धाडसी खेळ केला होता. तर पुजारा व कोहली अपयशी ठरले होते. तरीही फलंदाजांच्या फळीत कोणताही बदल होण्याची शक्यता नसून पहिल्या सामन्यात खेळलेला संघच भारत खेळवेल असे दिसते. मात्र दक्षिण आफ्रिकेकडे कागिसो रबाडा, लुंगी एंगिडी, मार्को जेनसन सारखे भेदक गोलंदाज असल्याने त्यांना हलक्यात घेणे भारतासाठी घाट्याचा सौदा ठरू शकतो.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

