नीरा-भीमा कारखान्याच्या नावलौकिकात ४ पुरस्कारांनी भर - हर्षवर्धन पाटील
- शहाजीनगर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार
फोटो- शहाजीनगर येथे नीरा भीमा कारखान्यावरती व्हीएसआय पुरस्कार प्राप्त शेतकरी, अधिकाऱ्यांचा सत्कार प्रसंगी हर्षवर्धन पाटील, लालासाहेब पवार.
इंदापूर : प्रतिनिधी दि.13/1/2022
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हि.एस.आय.) चे गळीत हंगाम सन 2020-21 साठी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याला संबंधित असे तब्बल 4 पुरस्कार जाहीर झाले आहेत. एखाद्या साखर कारखान्याला एकाच वेळी 4 पुरस्कार मिळणे ही राज्यातील पहिलीच अभिनंदनीय बाब आहे. या 4 पुरस्कारांमुळे नीरा-भीमा कारखान्याच्या नावलौकिकामध्ये भर पडली आहे, असे गौरवोद्गार कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी ( दि.13) काढले.
शहाजीनगर येथे कारखान्याच्या शहाजीराव पाटील सभागृहामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून मध्य विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नीरा भीमा कारखाना जाहीर झालेबद्दल कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील यांचा तसेच कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी आनंदराव नामदेव बोंद्रे (रा.निमसाखर) व आबासाहेब तुळशीराम घोडके (पिंपरी बु.) यांचा ऊस भूषण पुरस्कार जाहीर झालेबद्दल त्याचबरोबर कारखान्याचे पर्यावरण अधिकारी कल्याण गायकवाड यांचा उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जाहीर झालेबद्दल हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, पुरस्कारामुळे आणखी काम करणेसाठी प्रेरणा, ऊर्जा प्राप्त होते. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे. नीरा भीमा कारखान्याने आजअखेर 3 लाख 71 हजार मेट्रिक टनाचे ऊस गाळप पूर्ण केले असून, शेतकऱ्यांचा सर्व उसाचे गाळप केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली. नीरा-भीमा कारखान्याला आजपर्यंत राज्य व देशपातळीवरील एकूण 12 पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहितीही अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी दिली. यावेळी संचालक विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार उपस्थित होते.
_________________________

