शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२
राज्य सरकारचे आर्थिक फायद्यासाठी मद्यपान व व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय..!!
पारनेर : देशाच्या संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून,अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे त्यासाठी लोकशिक्षण, लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान व व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत आहेत. हे राज्यातील जनतेचे दुर्दैव असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.
या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात हजारे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने नुकताच सुपर मार्केट व किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे.
वाईन म्हणजे दारू नाही असेही समर्थन करण्यात येत आहे. असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे.या निर्णयाने आपणास दु:ख झाले असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचेच हित जोपासायचे असेल तर राज्य आणि केंद्र सरकारने शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव द्यायला हवा. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षात १ हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार असा प्रश्न हजारे यांनी पत्रकात उपस्थित केला आहे.
सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे.दुसरीकडे मात्र सरकारमधील लोक या निर्णयाचे समर्थन करीत आहेत.केवळ महसूल मिळतो म्हणून तसेच महसूलाचे लक्ष साधण्यासाठी अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देणे राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी असल्याचा टोला हजारे यांनी पत्रकात लगावला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

