प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
आपल्या मित्राच्या लग्नात निघालेल्या मिरवणुकीत वाद्याच्या तालावर बेधुंद होऊन नाचल्यानंतर तरुणाला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. यातच तरुणाचा मृत्यू झाला. वैभव रामभाऊ राऊत (वय 25 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.
सायंकाळी सहा- साडेसहाच्या सुमारास लग्नापूर्वी मारुतीला पाया पडण्यासाठी नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी सुरू असलेल्या वाद्यांच्या तालावर सर्व तरुण मंडळी बेधुंद नाचत होती. अगोदरच दिवसभर असलेला उन्हाचा पारा व त्यातच बेधुंद नाचणे बराच वेळ सुरू होते.
मिरवणूक लग्नस्थळी येताच तेथे वैभव राऊत मित्रांसह खुर्चीवर बसला व तेथे बसून त्याने तहान लागल्याने गटागटा असे पाणी पिले. त्यानंतर लगेच त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे लग्नस्थळी प्रचंड गोंधळ उडाला. घटनेनंतर त्यास माजलगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांस मृत घोषित केले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.


