नीरा भीमा कारखान्याकडून ७ लाख मे.टन गाळपाचा विक्रमी टप्पा पूर्ण
- हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन
इंदापूर: प्रतिनिधी
शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये शनिवारी (दि.2 एप्रिल) सकाळी 7 लाख मे. टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करून कारखान्याच्या इतिहासामध्ये विक्रमी कामगिरी केली आहे, अशी माहीती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी शनिवारी ( दि.2) दिली.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारखान्याने विक्रमी 7 लाख मे. टन ऊस गाळपाचा टप्पा पुर्ण केलेबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे. यापूर्वी कारखान्याने सन 2014-15 च्या गळीत हंगामात उच्चांकी 6 लाख 46 हजार 985 में. टन ऊसाचे गाळप केले होते.
सध्या कारखान्याचा चालू 21 वा गळीत हंगाम हा अंतिम टप्प्यात असून कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण केले जाईल, असेही याप्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जमादार, प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील, अधिकारी उपस्थित होते.

