शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०२ ऑगस्ट २०२२
दुर्गम भागात परीक्षा केंद्र; बसची व्यवस्था करा ; आम आदमी पक्षाची मागणी; तारकपूर आगार व्यवस्थापकांना निवेदन..!!
अहमदनगर : शहरासह इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे एमएस-सीईटी परीक्षेचे नंबर अकोला तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या महाविद्यालयात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने परीक्षा कालावधीत शहरातून जादा बसेसची व्यवस्था करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. तारकपूर डेपोचे आगार व्यवस्थापकांना या मागणीचं निवेदन पक्षाच्यावतीने देण्यात आले आहे.
आगार व्यवस्थापकांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले. आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, शहर कार्याध्यक्ष भरत खाकाळ, संघटक प्रा. अशोक डोंगरे, मनोहर माने, दिलीप घुले, संपत मोरे, मारवाडे, रवी सातपुते, रोहन गायकवाड आदी उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे एमएस-सीईटी परीक्षा ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. शहरासह इतर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नंबर अकोले येथील महाविद्यालयात आलेले आहे. सदर परीक्षेचे ठिकाण अत्यंत लांब व दुर्गम भागात असल्याने तिथं जाण्याची पुरेशी सोय नाही. या परीक्षेसाठी बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने परीक्षा कालावधीत अकोले या ठिकाणी शहरातून जाण्यासाठी पहाटे सहा ते सकाळी साडेसात यावेळेत आणि सायंकाळी परतीसाठी विशेष बसची व्यवस्था करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
विद्यार्थ्यांची सोयीच्या दृष्टीकोनाने त्यांचे परीक्षा केंद्र ठरविणे आवश्यक आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या अकोला तालुक्यातील महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांचे एमएस-सीईटी परीक्षेचे नंबर आले असून, यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. विद्यार्थ्यांना जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवणे सोयीचे असून, यामुळे विद्यार्थी दडपणाखाली न राहात वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचून परीक्षा देऊ शकतील, अशी प्रतिक्रिया पक्षाचे शहर संघटक प्रा. अशोक डोंगरे यांनी दिली.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

