राजगुरूनगर : रानमळा पॅटर्नचे प्रवर्तक, माजी आदर्श जि. प. सदस्य, माजी आदर्श सरपंच व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव तुकाराम उर्फ पी. टी. शिंदे गुरुजी ( वय ७८ वर्षे ) यांचे आज दुपारी दिल्ली येथे आकस्मिकपणे निधन झाले. ते काल दिल्ली येथे पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले होते. पुरस्कार प्राप्त झाल्यनंतर आकस्मिकपणे त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी पंचायत समिती सदस्या व आदर्श शिक्षिका मंगलताई शिंदे यांचे ते पती, तर पत्रकार मिलिंद शिंदे यांचे ते वडील होत.
ते सरपंच असताना वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम केल्याने महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन प्रथमच त्यांच्या रानमळा पॅटर्नच्या नावाने जी आर काढला. पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची कास त्यांनी अंगिकारली. रक्षा विसर्जन न करता रक्षा खड्ड्यात टाकून स्मृती वृक्ष लावण्याची संकल्पना त्यांनी जनमाणसात रुजवली. नुकत्याच महाराष्ट्रभर सुरु केलेल्या 'एक विद्यार्थी, एक झाड' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना शनिवारी पेठ येथील आंबेगावच्या हायस्कुल शाळेत हा त्यांचा उपक्रमाचा शेवटचा कार्यक्रम झाला, तर आज दिल्ली येथे त्यांचा 'पर्यावरणवादी रियल सुपर हिरो' या अखेरच्या पुरस्काराने सन्मान झाला.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पी टी गुरुजींना कॉल
पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या उदघाटनासाठी गुरिजींनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कॉल केला होता. ते बैठकीत असल्याने कॉल घेतला नव्हता. ते त्यांना रानमळा पॅटर्नच्या माध्यमातून वैयक्तिक ओळखत असल्याने मुनगंटीवार यांनी गुरुजींना शनिवारी कॉल करून भेटीसाठी २५ तारीख देऊन मुंबईला बोलावले होते. अखेर हि भेट अधुरी राहिली. त्यांचे पर्यावरणावर काम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असून हे काम पर्यावरण जागर प्रतिष्ठान पुढे चालू ठेवणार आहे. यावर्षी त्यांचे नाव पदमश्री पुरस्कारसाठी चर्चेत होते.

