बोरी खुर्द:-
निरोगी व भयमुक्त बालके हेच राष्ट्राचे भविष्य असून बालकांची काळजी, संरक्षण, संवर्धन व संगोपनाची जबाबदारी ही समाजातील प्रत्येक घटकाची आहे. घरदार सोडलेल्या, रस्त्यावर व प्लॅटफॉर्मवर भीक मागणाऱ्या व अंधकारमय जीवन जगणाऱ्या बालकांना प्रकाशमय भविष्य हे समतोल फाउंडेशन देते असे समतोल फाउंडेशनचे संस्थापक सचिव व बोरी खुर्द साळवाडी चे भूमिपुत्र विजय जाधव यांनी प्रतिपादन केले.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी व बाल दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी खुर्द येथे समतोल फाउंडेशन च्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले याप्रसंगी विजय जाधव बोलत होते. समतोल फाउंडेशन मार्फत मामनोली ता. मुरबाड येथे स्वामी विवेकानंद मन परिवर्तन केंद्रात कुटुंबापासून दूर भरकटलेल्या लहान बालकांना संस्कारक्षम शिक्षण देऊन त्यांना निवास, भोजन, व्यवहारिक ज्ञानाबरोबरच शेती, व्यक्तिमत्व विकास व स्वावलंबी शिक्षण दिले जाते.
या मनपरिवर्तन केंद्रातून जवळपास चाळीस हजाराहूनही अधिक बालके संस्कारक्षम शिक्षण घेऊन कुटुंबासमवेत आनंदी जीवन जगत आहेत. सदर मन परिवर्तन केंद्रात लहान मुलांची सहल घेऊन आल्यास सर्व मुलांची व्यवस्था मोफत करण्याची ग्वाही विजय जाधव यांनी याप्रसंगी दिली. याप्रसंगी पुणे जिल्हा रहिवासी उत्कर्ष मंडळाचे सचिव व ज्येष्ठ नाट्यकर्मी रवींद्र औटी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नामदेव पवार, रंगनाथ बांगर, शिवाजी बेल्हेकर, दीपक बेल्हेकर, सुभाष बांगर, महेंद्र काळे, गोरख शेटे, विठ्ठल जाधव, पोलीस पाटील प्रगती सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक शेळकंदे सरांनी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक अशोक हांडे सरांनी केले तर शिंदे सरांनी उपस्थितांचे आभार मानले...

