आता सरकारचे उत्पन्न वाढले आहे. यामुळे मध्यप्रदेशच्या धर्तीवर सरकारने विज बिल माफी करावी - आ.दत्तात्रय भरणे
इंदापूर प्रतिनिधी: मागील दोन वर्षात कोरोनामुळे सरकारच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता आता सरकारचे उत्पन्न वाढले आहे. यामुळे मध्यप्रदेशच्या धर्तीवर सरकारने विज बिल माफी करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली.
इंदापूर तालुक्यामध्ये थकीत वीज बिलाअभावी अनेक शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर आमदार भरणे यांनी वीज कंपनीचे अधिकारी व शेतकरी यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी भरणे बोलत होते.
बोलताना भरणे म्हणाले, सध्या शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देताच त्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न मांडला जाईलच परंतु सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण विज बिल माफी करावी अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्या सरकारपर्यंत कळवाव्यात एक बिल भरणे कोणालाही मान्य नाही यामुळे शेतकरी कायदा हातात घेतील आणि मोठे आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असे प्रतिपादन यावेळी भरणे यांनी केले.
यावेळी महावितरणचे बारामती कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,मुख्याधिकारी रामराजे कापरे हे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
पिण्याचे पाणी तोडाल तर याद राखा..
यावेळी काही गावातील नागरिकांनी आमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे कनेक्शन तोडल्याचे बैठकीत सांगितले यावेळी आमदार भरणे आक्रमक झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम देत पिण्याचे पाणी तोडाल तर याद राखा,गाठ माझ्याशी आहे असा दम भरला आणि यापुढे पाण्याच्या कनेक्शनचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही याची काळजी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.

