shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हाभरात सर्वांच्या मनी एकच सूर ! असे दिलदार व्यक्तीमत्व शेख मन्सूर !!

प्रेम, संयम व त्यागी वृत्तीने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा निर्पेक्ष अवलिया

अहमदनगर :
समाजातील काही व्यक्तिमत्वही अशी असतात की, लांबून अंदाज बांधणे फार अवघड होते. जे जवळ येतात त्यांना त्या व्यक्तिमत्त्वचे खरे दर्शन घडते. मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूरभाई शेख असेच उमदे, दिलदार, दिलखुलास व्यक्तिमत्व आहे.

आज मन्सूरभाई यांचा वाढदिवस आहे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता एवढी ओळख त्यांच्याबाबतीत पुरेशी नाही. त्यांचे वडिल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजीजभाई चष्मावाला व त्यांचे मोठे बंधू शकुरभाई शेख यांच्याकडून त्यांना पत्रकारिता व सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. त्यांनी हा वारसा समर्थपणे पुढे चालवत आपली अहमदनगर जिल्ह्याच्या मातीत एक वेगळी ओळख निर्माण केली. अहमदनगर प्रेस क्लबच्या कठिण काळात अध्यक्षपदाची धुरा सांभाळून प्रेस क्लबला जिवंत ठेवले. प्रेस क्लबला ऊर्जित अवस्थेत आणून सर्व पत्रकारांना एक कुटुंबाप्रमाणे प्रेम दिले. एवढेच नव्हे तर पत्रकारांना मान, सन्मान व त्यांच्या हक्कासाठी संघर्ष केला. सातत्याने पत्रकारांसाठी विविध उपक्रमे घेऊन त्यांच्या गुणवंत पाल्यांचा व पत्रकारांचा गौरव केला. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेऊन विविध शिबीरे घेतले. वैद्यकीय मदत दिली, तर कोणत्याही पत्रकारावर संकट ओढवले असता त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून मदतीचा हात देण्याचा सातत्याने प्रयत्न केला व सध्याही करत आहे. रमजान ईद असो किंवा दिवाळी एकत्रित साजरी करुन जातीय सलोखा टिकवून भाईचारा वाढविण्याचे कार्य त्यांनी केले. प्रत्येक सामाजिक कार्यासाठी त्यांचा पुढाकार असतो.कोरोनाच्या संकटकाळात बाराबाभळीचा मदरसा विलगीकरण कक्षासाठी उपलब्ध करुन त्यांनी सामाजिक योगदान दिले. स्वत: ला कोरोनाची लागण होऊन देखील गोर-गरीबांसाठी मदतीचा हात मागे घेतला नाही. सहकाऱ्यांच्या मदतीने कोविड सेंटर सुरू करून मोफत उपचाराची सोय करून दिली.

कोणतीही प्रसिध्दी व गाजावाजा न करता या दिलदार व्यक्तीमत्वाचे कार्य आजतागायत सुरु आहे. बोलणार नाही तर करुन दाखविणार असा भारदास्त व्यक्तीमत्वाला अनेकांनी जवळून अनुभवलेही असेल.निगर्वी, प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे. कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा, आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभावगुण विरळच! गरजूंना मदत करणे हा त्यांचा जणू छंदच. सतत तोंडावर अल्लाहाचे नांव, एक हाजी मात्र जेंव्हा दुष्काळ पडतो तेंव्हा स्वत:च्या खिश्यातून प्रेस क्लबच्या नावाने गावाला आर्थिक मदत करतो, पत्रकारांच्या बरोबरीने श्रमदानात सहभागी होतो, देवगडची दिंडी घाटात आली की, वारकर्‍यांच्या सेवेसाठी औषधाचे किट घेऊन हजर असतो. दरवर्षी वंचित घटकातील मुलांचा बालदिन गोड करतो. राग ही भावना काय असते? त्यांना माहित नाही, आपल्या प्रेमळ स्वभावाने सतत माणसे जपण्याचा व जिंकण्याचा त्यांचा नेहमीचाच प्रयत्न. चुकीचे वाटले तर जरुर समजावतील, सांगतील. एखाद्या क्षणी त्यांच्या पध्दतीने व्यक्तही होतील. परंतू मनात कुणाबद्दलही काय, तर शत्रूबद्दलही आकस, राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे. 

तोंडावर गोड आणि बगल में छुरी ! अशी कपटनिती त्यांना कधीही जमली नाही. त्यांचे व्यक्तिमत्व हे स्पष्ट व दिलखुलास आहे. कोणाबद्दलही मनात राग न ठेवता, राग न धरता संवाद साधणारे हे व्यक्तिमत्व आहे. दुपारच्या वेळी कोणी भेटलाच तर लस्सी पाजूनच सोडणार. जेवलात काय? कसं चाललय?, काही समस्या नाही ना? अशा आपलुकीपणाने प्रश्‍नांची सरबत्ती करणार. असा आस्थेवाईकपणा आणि आपलेपणा फक्त मन्सूरभाईंजवळच अनुभवायला मिळतो. म्हणूनतर जिल्हाभरात सर्वांच्या मनातील एकच सूर,असे दिलदार व्यक्तीमत्व शेख मन्सूर
प्रेम,संयम व त्यागी वृत्तीने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा एकच अवलिया म्हणून त्यांची ओळख कायम मनात घर करणारी अशा
 दिलदार तथा स्वच्छ मनाच्या मन्सूरभाई शेख यांना त्यांना त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ खुप, खुप हार्दिक शुभेच्छा ! तसेच त्यांना नेहमी सुखसमृद्धी सोबत उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा !!

शुभेच्छूक :
स्वाभिमानी संपादक सेवा संघ,आणि
 समता फाऊंडेशन परिवार,श्रीरामपूर
close