जावेदभाई शेख
श्रीरामपूर - आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही देशात जनावरांची गणना होते परंतु सरकार ओबीसींची जनगणना करत नाही. त्यामुळे ओबीसींची जातवार जनगणना करण्यासाठी सर्व ओबीसी समाजाने देशव्यापी आंदोलन केले पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांनी केले.
ओबीसींची जातवार जनगणना झालीच पाहिजे व निवडणुकीत इ.व्ही.एम. मशीन बंद करुन मतपत्रिकेद्वारे निवडणूका घ्याव्यात यासाठी राष्ट्रीय ओबीसी मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून सुरु असलेली राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रे निमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी बहुजन मुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत व्होवाळ, भटके विमुक्त समाजाचे नेते मल्लू शिंदे, शिंपी समाज संघटनेचे नरेंद्र लचके,एकलव्य भिल्ल संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते इब्राहिमभाई शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. एम.धनवडे, यांनी तर सूत्र संचालन मुश्ताक तांबोळी यांनी केले,आभार फ्रान्सिस शेळके यांनी मानले. यावेळी डॉ.अशोक शेळके, बबन शेलार, प्रतीक जाधव, कैलास खंदारे, सुरेश खरात, संजय वाव्हुळ, भाऊसाहेब खरात, प्रमोद शेळके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित हाेते.
सौजन्य: स्वाभिमानी न्यूज नेटवर्क

