प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २१ / सीना कोळगाव धरणातून वारीच्या नावाखाली पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेतर्फे पाटबंधारे विभागास ई-मेल द्वारे देण्यात आला. सीना कोळगाव प्रकल्पा मध्ये आज रोजी अत्यल्प प्रमाणात पाणी साठा आहे व पाणी पातळी डेड स्टॉक मध्ये आहे. तसेच आम्ही धरणग्रस्त बांधवांनी आमची घरे-दारे, जमीन जुमला सर्व काही धरणासाठी देऊन आम्ही धरणग्रस्त बांधवांनी त्याग केला आहे. यावर्षी अजून ही पाऊस पडला नाही म्हणून आमची उभी पिके अगोदरच जळून गेली आहेत पाणी पातळी खाली गेल्या मुळे आम्हाला वारंवार केबल, पाईप सातत्याने वाढवावे लागत आहेत. तोच खर्च आम्हाला न झेपणारा झालेला आहे.
करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण, हिवरे, हिसरे, कोळगाव, निमगाव (ह), आवाटी व परंडा तालुक्यातील डोंजा, कौडगाव व परिसरातील सर्व शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. आपण आमचा अंत पाहू नये व विनाकारण कोणी तरी वारीच्या नावाखाली पाणी मागत असेल तर ते आम्ही धरणग्रस्त शेतकरी सहन करणार नाही तरी आपण पाणी सोडल्यास धरणग्रस्त संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपणच जबाबदार असाल असा इशारा सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेच्या वतीने पाटबंधारे विभागास करण्यात आला आहे.

