shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ठेवीदारांची फसवणूक, कोट्यावधींचा अपहार पतसंस्थेतील अनामती बुडतीच्या मार्गावर ?


यशस्विनी सह.पतसंस्थेत ४८ कोटींचा घोटाळा
अध्यक्ष,व्यवस्थापक,संचालकांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर 
यशस्विनी महिला स्वयंसहायता गट सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून तब्बल ४७ कोटी ८२ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळासह तब्बल सोळा जणांविरोधात सिडको पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लेखापरीक्षक सीए महेश कदम यांनी येथील जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्या परवानगीने जिल्हा यशस्विनी महिला स्वयंसाह्यता गटाची सहकारी पतसंस्थेचे लेखापरीक्षण केले. त्यांनी संस्थेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण २५ जून ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत पूर्ण करून विशेष अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर केला होता.
संस्थेच्या जिल्ह्यातील संलग्न शाखांकडून आलेले कर्ज मागणी अर्ज व इतर कागदपत्रांची परिपूर्ण छाननी करून ते पोटनियमातील तरतुदींच्या निकषानुसार पात्र असल्यास संस्थेच्या संचालक मंडळाने सर्वसाधारण सभेत मंजूर करणे आवश्यक आहे. मात्र, लेखापरीक्षणात संस्थेने सर्व नियमांची पायमल्ली करून ही अफरातफर केल्याचे उघड झाले. बचत गटाच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून त्याआधारे कर्ज उचलून आरोपींनी ठेवीदारांच्या पैशांची अफरातफर करत फसवणूक केली.
*बनावट कागदपत्रांच्या आधारे*
 *कोट्यावधींची अफरातफर*
या घोटाळ्यात जिल्ह्यातील विविध बचत गटांच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून कर्ज उचलण्यात आले. २८ कोटी ८१ लाख ८५ हजार ३६ रुपयांचे आणि १९ कोटी ५६ हजार २८२ रुपयांचे विनातारण कर्ज वाटप करत एकूण ४७ कोटी ८२ लाख ४१ हजार ३१८ रुपयांची अफरातफर केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.


पतसंस्था अध्यक्ष, व्यवस्थापक
संचालक आदिंवर गुन्हे दाखल
पतसंस्थेच्या अध्यक्षा सविता देविदास अधाने, उपाध्यक्ष मनीषा अंभोरे, संचालिका वर्षा कोळगे, विजया सुरासे, सविता गिराम, अनिता काळे, भाग्यश्री निकम, कविता नागुर्डे, मंदा काकडे, जुबेदाबी शहा, हिराबाई चन्ने, कविता सोनवणे, मंगल मोरे तसेच माजी व्यवस्थापक गणेश शिंदे, व्यवस्थापक पवन देविदास अधाने आणि अध्यक्षांचे पती देविदास अधाने यांच्याविरोधात भादंवि कलम ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२० ब, ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत.

पतसंस्थेत अनामत म्हणून ठेवल्याल्या सर्वसामान्यांच्या पैशाला वाली कोण ?
शहरात गेल्या काही दिवसांमध्ये पतसंस्था,अर्बनमधील बॅंकिंग घोटाळ्यांनी खळबळ उडालेली आहे. सर्वसामान्यांचा पैसा पतसंस्थांमध्ये असतो. व्याजदर जास्त मिळत असल्याने तुटपुंज्या कमाईतूनही थोडीशी बचत करीत गोरगरीब पतसंस्थांना प्राधान्य देतात. पण आता त्यांचा पैसाच सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे. मलकापूर अर्बननंतर आदर्श नागरी सहकारी पतसंस्था तसेच देवाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यानंतर आता यशस्विनी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून पुन्हा घोटाळा उघडकीस आल्याने पतसंस्थांच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, बोटावर मोजण्याइतक्या पतसंस्था चांगले काम करीत असूनही त्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे.
close