*राजेंद्र बनकर / शिर्डी
दिवसेंदिवस शिर्डी नगरीचा चेहरामोहरा बदलत जात आहे. शिर्डी ग्रामस्थांना श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या जाचक अटी तटींचा सामना करावा लागत आहे. प्रसंगी एखाद्या विषयाला वाचा फोडण्यासाठी आंदोलनं तसेच उपोषण करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.ही ग्रामस्थांच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे.राजकिय नेते, ठराविक ग्रामस्थ वगळता आजही अनेक ग्रामस्थांना मंदीरातील ग्रामदेवता असलेले श्री गणेश मंदिर,श्री महादेव मंदिर तसेच श्री शनी मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक वेठीस धरतात.प्रसंगी ग्रामस्थांना ओळख पटवून देण्याची नामुष्की ओढावते.
या तिन्ही मंदीरात दर्शनासाठी प्रवेशद्वार क्रमांक चार मधून सोडल्यावर बाहेर सोळा गुंठ्याशेजारच्या मारुती मंदिरात जाण्यासाठी तीन नंबर गेटने सोडणे क्रमप्राप्त असतांनाही तेथून जाऊ दिले जात नाही. त्यामुळे पुन्हा माघारी फिरून मोठा फेरफटका मारायला लावतात.ही ग्रामस्थांची अवस्था झाली आहे.त्यामुळे याविषयावर सर्व शिर्डी ग्रामस्थांनी मतभेद विसरून एकत्र यावे आणी एकजुटीने चारही प्रवेशद्वार खुले करून घ्यावे असे शिर्डी नगर पंचायत चे मा.उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी सांगितले. तसेच श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंदिर परिसरात चप्पल बंदीचा निर्णय घेतला असला तरी त्याच ताकदीने भाविकांच्या चप्पल बुट व मोबाईल लॉकरसाठी ठिकठिकाणी स्टॉल लावणे गरजेचे होते मात्र तसे काही झाले नाही. परिणामी आजही हजारो भाविकांच्या चप्पल,बुट रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांच्यासह मला पहावयास मिळाले याबाबत खंत वाटते. साईभक्तांसाठी मोबाईल लॉकर मोफत करावे.जूने पी.आर.ओ कार्यालय पुर्वीच्या ठिकाणी असावे,जेणेकरून व्हीआयपी भाविकांना सशुल्क दर्शन पास काढून शनिगेट मार्गे जाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही. मागे उपोषणादरम्यान महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, साईसंस्थान प्रशासनाने निर्णय घेतांना ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे असे सुतोवाच जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना केले होते.मात्र या गोष्टीला महिना देखील उलटला नाही तोच साईसंस्थान प्रशासनाकडून दोन प्रवेशद्वारे बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे कळाले आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन कॉल घेतला नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात साईमंदीर परिसरातील ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी शिर्डी ग्रामस्थांना मुकण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे दिलेल्या प्रसिद्धी पञकात श्री.जगताप यांनी म्हटले आहे.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9651174111

