*राजापूरच्या प्रगतिक शाळेत गेट टू गेदर कार्यक्रम संपन्न
संगमनेर प्रतिनीधी:
महिने सरले वर्षामागून वर्ष गेली अन् ते ४० वर्षांनी समोर एकमेकांना भेटले, सर्वांनाच समोर पाहून ४० वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर तरळला अन् प्रत्येकाला गहीवरून आले. अंत:करण भरून आले,
निमित्त होते १९८४ ला दहावीत असलेल्या 'वर्ग मित्रांच्या एकत्रित भेटीचे. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अक्षरशः ओसंडून वाहत होता.
राजापूर ता संगमनेर जि. अहमदनगर येथे १४ जून १९८१ रोजी गावातीलच स्थानिक प्रागतिक शिक्षण संस्थेने इयत्ता ८ वी चा वर्ग सुरु केला अन् गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण करून शहरात जाण्याच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या - सोयी साठी गावातच माध्यमिक विद्यालय सुरु झाले, बघता बघता दहावीची पहिली बॅच १९८४ साली बाहेर पडली, ती १००% निकाल घेवूनच, तेच विद्यार्थी आज तब्बल ४० वर्षांनी त्याच विद्यालयात एकमेकांना भेटले. १९८४ च्या दहावी बॅच मधील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी एकमेकाला भेटली.एकमेकाची विचारपूस करण्यात आली प्रत्येकाने दहावीनंतरचा शैक्षणिक प्रवास उलगडत हळूवारपणे कौटुंबिक पार्श्वभूमी विषद केली. अनेक जण सेवानिवृत झालेले होते, काही शासकीय निमशासकीय सेवेत,काही व्यवसायात तर काही उत्तम शेतीत रमलेले सर्वांनी दहावीत असतानाच्या गमती - जमती, केलेल्या खोड्या, त्यावेळची अभ्यासातली निकोप स्पर्धा, शिक्षकांनी पहिल्या बॅचचा निकाल १००% लागावा म्हणून घेतलेली अपार मेहनत, त्यातून आम्ही कसे घडलो हे सांगताना माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना, आपल्या आठवणींना उजाळा देताना अनेकांना ते दिवस म्हणजे सर्वात सुखाचा व आनंदाचा काळ होता हे मनोमन वाटून गेले.
जिल्हा परिषद शाळेने एका वर्गात एक टेबल व दोन शिक्षकांवर सुरु झालेले विद्यालय आज असंख्य विद्याथ्यांना ज्ञानाचे धडे देत आहे. इयत्ता ५ वी ते १२ वी व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संस्थेचे गावात उभे राहीले मात्र त्याचं संस्थेचे पायाचे शिल्प आज संस्थेत आले, संस्थेची झालेली प्रगती पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले.
माजी विद्यार्थि रामनाथ भालेकर यांनी गायलेले 'दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा' तसेच ४० वर्षापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमात गायलेले अंधा कानून चित्रपटातले रोते रोते हसना सिखो, हे गीत मनाला चटका लावून गेले. प्रत्येकानेच आपल्या भावनां व्यक्त केल्या, एका मित्राने तर आपल्या मित्राच्या गळ्यात पडून अक्षरशः हंबरडाच फोडला कारण त्याने मित्र भेटीसाठी केलेला नवस आज पुर्ण झाला होता.
विद्यालयाच्या प्राचार्यपदी त्याच बॅचचा विद्यार्थी रामनाथ खतोडे यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत होता व संस्थेचा विश्वस्त झालेला पुंजाहरी हासे यांना पाहून सर्वांनाच अभिमान वाटला, माजी विद्यार्थ्यांमध्ये कोणी शिक्षक, मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख तर कोणी कंपनीत जॉब करत असल्याचे सांगितले. नुकतेच केंद्र प्रमुखपदी पदोन्नती मिळालेले गोरक्षनाथ हासे यांचा सत्कार करण्यात आला.
नाशिकला स्वतःची कंपनी स्थापन करून यशस्वी उद्योजक बनलेले बाळासाहेब हासे तर विजय हासे सलग पंधरा वर्षे ग्रामपंचायत उपसरपंच ,माधव हासे यांनी जिल्हा पातळीवर शिक्षकांचे नेतृत्व केले,शरद खतोडे हे कसारा दुमाला येथे आदर्श उपसरपंच व सामाजिक कामात अग्रेसर असल्याचे सांगितले,
नुतन माध्यमिक विद्यालयाच्या हॉल मध्ये झालेल्या गेट टु गेदर कार्यक्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी - नाशिक अहमदनगर, पुणे येथून आल्याचे दिसून आले. अनेक वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. नाशिक येथील उद्योजक बाळासाहेब हासे यांनी सर्वांना दिलेल्या स्नेहभोजनाने एकमेकांना पुन्हा भेटू म्हणत सर्वांनी निरोप घेतला.
या कार्यक्रमासाठी माधव हासे, बाळासाहेब हासे, सुरेश हासे, सुरेश चौधरी ,गोरख देशमुख आण्णा निळे ,गोरक्षनाथ हासे पुंजाहरी हासे, शिवाजी नागरे, विजय हासे, शिला हासे, हौसाबाई हासे, कमल हासे, विमल हासे ,सुकदेव हासे, संभाजी सोनवणे ,सुकदेव देशमुख, शरद खतोडे, नवनाथ हासे, कैलास देशमुख, मधुकर देशमुख, राजेंद्र खैरनार, बाळासाहेब देशमुख ,रमेश सोनवणे, भरत भांड, श्रीकांत हासे, कचरू गुंजाळ, विश्वासराव सोनवणे, गणपत हासे ,रामनाथ खतोडे आदि माजी विद्यार्थ्यांसह उत्तम हासे व सेवानिवृत्त प्राचार्य तुकाराम कोठवळ, प्राचार्य डी. टी. गुंजाळ हे पहिल्या बॅचचे शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन नाशिक येथील यशस्वी उद्योजक बाळासाहेब हासे,माधव हासे, रामनाथ भालेकर,पी.डी.हासे , शिवाजी नागरे ,गणपत हासे व प्राचार्य रामनाथ खतोडे यांनी केले.
*पत्रकार लियाकतखान पठाण - संगमनेर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

