शिर्डी प्रतिनिधी:
शिर्डी मतदारसंघातील तरूणांकडे कौशल्य आणि प्रतिभा काकणभर अधिकच आहे. तरीही त्यांना नोकरीच्या शोधात शेजारील जिल्ह्यांत भटकावे लागते, धक्के खावे लागते. स्थानिक रोजगार निर्मितीवर आवाजच उठवला जात नाही. बेरोजगार तरूणांच्या भावनांची कुठलीच कदर केली जात नाही. ही स्थिती भावी पिढीच्या भविष्याच्यादृष्टीने चिंताजनक आहे, म्हणूनच या सर्वसामान्य तरूण पिढीचा खंभीर आवाज होण्यासाठी सरसावलो आहे.
संधी मिळाली तर रोजगार निर्मितीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गाजविण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहे, असा मानस शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक किरण सुधाकर जाधव यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केला.
शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेसकडून संभाव्य इच्छुक म्हणून मैदानात उडी घेवून शिक्षणाने अभियंता, युवा उद्योजक असलेले किरण जाधव यांनी चांगलीच रंगत आणली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील चितळी येथील मुळ रहिवासी असलेले जाधव सध्या उद्योगाच्या निमित्ताने नाशिकला स्थायिक आहेत. दीनदलितांसाठी राबणारा काँग्रेरसला खंदा कार्यकर्ता म्हणून ते स्वत:चं आवर्जून उल्लेख करतात. शिर्डीचे जागावाटप भूतकाळात काय होते, हा प्रश्न आता निरर्थक आहे. मध्यंतरी राज्यातील राजकीय पडझडीनंतर कोणतीही राजकीय स्थिती गृहीत धरली जावू शकत नाही. महाविकास आघाडीचे नवे जागावाटप अद्याप निश्चित नाही. त्यामुळे जोर लावला तर ही जागा काँग्रेसला आणि उमेदवारी मला हे देखील शक्य आहे, असा दावा ते करतात. त्यामुळे आधीच उमेदवारीच्या भाऊगर्दीने रंगतदार ठरण्याची चिन्हे असलेली शिर्डी लोकसभेची राजकीय लढत तीव्र होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
श्रीरामपूरशी अतूट नाळ जुळलेली असल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील सिंचन, शेती, सहकाराचा विकास आणि त्यासमोरील आव्हाने यांचा त्यांना जवळून परिचय आहे. सहकार आणि पाटपाणी येथील जीवनाचा आत्मा आहे. मात्र त्यासोबत खुंटलेल्या रोजगार निर्मितीकडे गांभीर्याने पाहावे लागेल. तरूण पिढीच्या काही अपेक्षा आहेत. त्याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही.
स्थानिक तरुणांनी आपल्या रोजीरोटीसाठी शेवटी आता कुठवर धक्के खायाचे? असा खडा प्रश्न त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.कारण
राजकारण आपल्या गतीने धावतच राहील. मात्र या गोंधळात दुर्लक्षीत झालेला युवा आणि बेरोजगार या घटकांचा आवाज होण्याचा माझा प्रयत्न आहे असे जाधव म्हणाले.
आपला मुद्दा उलगडताना त्यांनी काही दाखले दिले. स्थानिक तरुण मेहनती आहे. आपला शेती व्यवसाय संभाळून उच्चशिक्षण घेत आहे. उच्च शिक्षणाचे माहेरघर म्हणून नगर जिल्ह्याची ठळक ओळख या गुणवान तरूणांमुळेच झाली. अभियांत्रिकी ते वैद्यकीय अशा विद्याशाखांचे शिक्षण येथील महाविद्यालयांतून होते. देशभरातून गुणवंत येथे येऊन शिक्षण घेतात. परंतु दर्जेदार शिक्षण प्राप्त केल्यानंतर पुढील रोजगारासाठी अन्यत्र जावे लागते. रोजगार-नोकरी शोधाच्या संघर्षात स्थानिक युवकांचे मनोबल खच्चीकरण होते आहे. शेती व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आपली क्षमता दाखवून जगाला गवसणी घालण्याची आपल्या जिल्ह्यातील युवकांची क्षमता आहे. स्थानिक युवक निराशेच्या गर्तेत अडकणार नाही, याची जबाबदारी घेण्यासाठी माझ्यासारख्या विकासाचे स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी धडपडणार्यांना सरसावलेच पाहिजे. त्याची सुरूवात शिर्डी मतदारसंघांचा सेवक होण्यापासून असेल. शिर्डीची उत्तम कनेक्टिव्हीटी मोठ्या उद्योगांना चालना देण्यासाठी पुरक आहे. आजपर्यंत मोठे उद्योग आणण्यात काय अडचणी होत्या, त्यात का कमी पडलो, त्यास कोण जबाबदार हा मोठा विषय ठरेल. त्यात न पडता किमान आतातरी प्रयत्न केले पाहिजे, हा सकारात्मक दृष्टीकोण ठेवून मार्गक्रमण करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

