इंदापूर: भारत देशामध्ये कुशल आणि कर्तबगार तरुणांची संख्या लक्षणीय असलेने एक दिवस या तरुणाईच्या प्रयत्नाने ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भारत देश जगामध्ये लवकरच यशाच्या शिखरावर पोहोचेल असे उदगार कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक व राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्य प्रशासकीय कार्यालयासमोर भारत देशाच्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहन राजवर्धन पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, भारत देश कृषी, औद्योगिक, वैज्ञानिक व शैक्षणिक इत्यादी सर्वच क्षेत्रामध्ये चौफेर प्रगती करीत आहे. आणि यामध्ये तरुणांच्या सक्रीय सहभागाचा व प्रगल्भ ज्ञानाचा मोलाचा वाटा आहे. याच जोरावर भारत देशाची मान जगात उंचावल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचेही कामकाज राज्याचे नेते व कर्मयोगी परिवाराचे आधारस्तंभ, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सर्व संचालक मंडळ यांचे सहकार्याने उत्तम चालले असून त्यामध्ये सभासद बंधु, तुम्ही सर्व कारखाना कर्मचारी, अधिकारी , ऊस तोडणी व वाहतूकदार या सर्वांचाच मोलाचा वाटा आहे असे गौरवोद्गार काढून त्यांनी उपस्थितांना व सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी, कारखान्याचे संचालक छगनराव भोंगळे, अंबादास शिंगाडे,. मच्छिंद्र अभंग व इतर सर्व संचालक, कार्यकारी संचालक . देवराव लोकरे, सर्व अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.